IND Vs ZIM: झिम्बाब्वेला हलक्यात घेण्याची चूक नको, टी-२०मध्ये तीन वेळा टीम इंडियाला दिलाय धक्का

ICC T20 World Cup, IND Vs ZIM: टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव झाल्याने भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश अनिश्चित झाला आहे. अशा परिस्थितीत आज होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या लढतीत भारतीय संघाची गाठ झिम्बाब्वेशी पडणार आहे. या लढतीत भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवाला लागणार आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव झाल्याने भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश अनिश्चित झाला आहे. अशा परिस्थितीत आज होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या लढतीत भारतीय संघाची गाठ झिम्बाब्वेशी पडणार आहे. या लढतीत भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवाला लागणार आहे.

क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचा संघ तुलनेने दुबळा असला तरी या संघाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसारख्या बड्या संघांना पराभवाचा धक्का दिला आहे. एवढंच नाही तर याआधी झिम्बाब्वेने टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाला तीन वेळा पराभूत केलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात खेळताना भारतीय संघाला सावधगिरीने मैदानात उतरावं लागणार आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेच्या दुबळ्या संघाने तीन वेळा भारतीय संघाला पराभूत केलं आहे. त्यात २०१५ मध्ये झिम्बाब्वेने भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला होता. तेव्हा झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १४५ धावा काढल्या होत्या. त्यानंतर झिम्बाब्वेने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला १३५ धावांवर रोखत १० धावांनी रोमांचक विजय मिळवला होता.

त्यानंतर २०१६ मध्येही झिम्बाब्वेने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला पुन्हा एकदा दणका दिला होता. तेव्हा झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा कुटल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाला १६८ धावांवर रोखत झिम्बाब्वेने थरारक विजय मिळवला.

या दोन पराभवांनंतर दोन वर्षांपूर्वी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला झिम्बाब्वेने पराभवाचा दणका दिला होता. २०२४ मध्ये हरारे येथे झालेल्या लढतीत झिम्बाब्वेने भारतासमोर केवळ ११६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र सिकंदर रजा याने केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचा डाव कोलमडला आणि झिम्बाब्वेने १३ धावांनी विजय मिळवला.