भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि अभिनेत्री-डान्सर धनश्री वर्मा या जोडीचा काही काळापूर्वी घटस्फोट झाला. २०२० मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू होऊन २०२५ ला ते वेगळे झाले.
दोघांच्या घटस्फोटाचे नेमके कारण काय, हे दोघांनीही सांगितले नाही. पण त्यांच्या घटस्फोटाची तुफान चर्चा रंगली. मध्यंतरीच्या चहलने स्वत:ची बाजू मांडली. त्यात तो धनश्रीवर थोडीफार टीका करताना दिसला.
त्यानंतर आता धनश्री वर्मा हिने Rise and Fall या शो मध्ये काही सहकलाकार स्पर्धकांशी संवाद साधत असताना आपली बाजू अतिशय रोखठोक शब्दांत मांडली. तसेच, युजवेंद्र चहलने केलेल्या अप्रत्यक्ष टीकेलाही उत्तर दिले.
धनश्री म्हणाली, 'लग्न हे दोन माणसांचे असते. अशा वेळी जर आमच्यात भांडणं होत असतील आणि दोघांपैकी एक जण जरी म्हणत असेल की, आपण नातं संपवूया तर तो निर्णय योग्य आहे.
'एकदा निर्णय झाला की त्यानंतर तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. मग नंतर ड्रामा करू नका. आपली अब्रू आपल्या हातात असते. तसंच तुम्ही एकदा लग्न केलंत की तुमच्या जोडीदाराची अब्रूही तुमच्या हातात असते.'
'तुम्ही एकमेकांचा आदर करायला हवा. एक महिला म्हणून मीही बोलू शकले असते. पण तो माझा नवरा होता. आम्ही पती-पत्नी असतानाही मी त्याचा आदर करायचे. आणि घटस्फोटानंतरही मी ही लक्षात ठेवते की, माझं त्याच्याशी लग्न झालं आहे.'
'तुम्हाला मोठं व्हायचंय तर तुम्ही स्वत:च्या कर्तृत्वावर मोठं व्हा. दुसऱ्याला कमकुवत दाखवून तुम्ही स्वत:ला वरचढ दाखवू नका. मला आता 'प्रेम' या शब्दाची चीड नाहीये, पण मला आता त्यात रसच उरलेला नाहीये,' अशी धनश्रीने स्पष्ट केले.