Ind vs Pak: "बाबरची विराटशी तुलना थांबवा", माजी क्रिकेटर संतापला; म्हणाला- "महान खेळाडू तोच असतो जो..."

Virat Kohli Babar Azam IND vs PAK, T20 World Cup 2026: बाबर आझम भारताविरूद्ध केवळ ७ धावांत बाद झाला

भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवला. 'काँटे की टक्कर' होण्याची अपेक्षा असलेला सामना भारताने एकतर्फी जिंकला.

ईशान किशनच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने प्रथम १७५ धावांचा पल्ला गाठला. पण पाकिस्तानला केवळ ११४ धावाच करता आल्या, त्यामुळे पाकिस्तानचा पराभव झाला.

पाकिस्तानचा बाबर आझम अतिशय बेजबाबदार फटका खेळून बाद झाला. अक्षर पटेलने त्याला ७ धावांवर बोल्ड केले. त्यानंतर आता माजी भारतीय क्रिकेटरने मत मांडले.

दिनेश कार्तिक म्हणाला, "विराट कोहली आणि बाबर आझम यांची तुलना अनेक वर्षे केली जात आहे. पण मला ही तुलना सुरुवातीपासून कधीच मान्य नव्हती आणि पटतही नाही"

"बाबर आझम सामन्यात जो शॉट खेळला, तसा बेजबाबदार फटका कोहली कधीच खेळत नाही. बाबरचा फटका सामना जिंकवण्यासाठी खेळलेला दिसलाच नाही."

"बाबरचा प्रयत्न केवळ मोठा फटका खेळण्याचा होता. कारण त्याला त्याचा स्ट्राईक रेट आणि रनरेट वाढवायचा होता. त्यासाठीच त्याने तसा बेजबाबदार शॉट खेळला."

"दबावाच्या प्रसंगातच खेळाडूची महानता समजते. प्रत्येक सामना सोपा नसतो. मैदानात येताच बडे फटके खेळणे योग्य नाही. बाबर आझममध्ये मला ती परिपक्वता दिसत नाही."

"बाबर आझम हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीच्या जवळपासही दिसत नाही. सध्याच्या क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा उत्तम टी२० खेळाडू आहे," असेही कार्तिक म्हणाला.