एशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताला विजेतेपद मिळवून देणारा युवा फलंदाज तिलक वर्मा आज देशाचा नवा हिरो बनला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऐन मोक्याच्या क्षणी संघाला सावरत त्याने नाबाद 69 धावांची मॅच-विनिंग खेळी साकारली.
तिलकचे आयुष्यही तसेच आहे. ही खेळी केवळ त्याच्या क्रिकेट कौशल्याचेच नाही, तर त्याच्या संघर्षाची आणि जिद्दीची कहाणी सांगते.
हैदराबादच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या तिलकसाठी क्रिकेटचा प्रवास सोपा नव्हता. आर्थिक अडचणी असूनही त्याच्या कुटुंबाने त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नाला नेहमीच पाठिंबा दिला.
वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी, प्रशिक्षक सलीम बायश यांनी त्याची प्रतिभा ओळखली आणि त्याला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. बायश हे त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे व्यक्ती ठरले.
घरगुती क्रिकेटमध्येही तिलकची कामगिरी दमदार होती. वयाच्या 16 व्या वर्षी त्याने हैदराबादकडून पदार्पण केले आणि 2020 मध्ये भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप संघातही त्याला स्थान मिळाले.
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतल्याने त्याच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली. या स्पर्धेत त्याने सातत्याने चमकदार कामगिरी करत आपले स्थान पक्के केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
या तिलकचा २०२२ पर्यंतचा प्रवास खडतर होता. मीडिया रिपोर्टनुसार तिलकचे वडील इलेक्ट्रीशिअन होते. त्यांच्या उत्पन्नावरच तिलकचे घर चालायचे.
यामुळे तिलकच्या वडिलांचे स्वत:चे घर नव्हते. मुंबई इंडियन्सने तिलकला १.७ कोटींची बोली लावली आणि आपल्या संघात खेळविले. तिथून तिलकच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
आज तिलकचे स्वत:चे घर आहे, गाड्या आहेत. एवढेच नाही तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसह अख्खी मुंबई इंडियन्सची टीम तिलकच्या घरी येऊन गेली आहे.