विश्वचषकात भारतीय संघ अजून चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या प्रतिक्षेत आहेत. या स्थानावर रायुडूला स्थान मिळायला हवे, असे साऱ्यांनाच वाटत होते.
विश्वचषकाचा संघ निवडण्यात आला. त्यावेळी रायुडूचे संघात नाव नव्हते. त्यामुळे बऱ्याच जणांनी निवड समितीवर टीका केली होती.
विश्वचषकाच्या संघात आपले नाव नसल्याचे पाहिल्यावर रायुडू निराश झाला होता. त्यानंतर त्याने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने निवड समितीला लक्ष्य केले होते.
आता मी 3D गॉगल घालून विश्वचषकाचा सामना बघणार, जेणेकरून मी विश्वचषकात खेळत असल्याचा भास मला होईल, अशा आशयाचे ट्विट रायुडूने केले होते.
अंबाती रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने वर्ल्ड कप संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला.
धवन व शंकर माघारी फिरूनही रायुडूच्या नावावर काट मारत बीसीसीआयनं रिषभ पंत व मयांक अगरवाल यांना लंडनला पाठवले.
आता आपल्याला भारतीय संघात स्थान मिळणार नाही. निवड समिती आपल्यावर राग काढणार आणि यापुढेही आपल्याला संघातून बाहेर काढणार, असे रायुडूला वाटले.
रायुडूचा हा विचार, पूर्णपणे चुकीचा आहे, असे कुणीही म्हणणार नाही. त्यामुळेच रायुडूने अखेर अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला.