नवी दिल्ली : विश्वचषकात आजच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली आहे. ब गटातून भारत आणि पाकिस्तान यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर अ गटातून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे. नेदरलॅंड्सच्या विजयामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीचे तिकिट मिळाले आहे. तर आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला त्यामुळे नेदरलॅंड्सच्या संघाचा फायदा झाला आहे. जरी त्यांना उपांत्य फेरी गाठता आली नाही तरीदेखील त्यांना आगामी विश्वचषकात याचा फायदा होणार आहे.
पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम आणि नेदलॅंड्सचा फलंदाज टॉम कूपर यांचा संवाद व्हायरल होत आहे. हा संवाद पाकिस्तानचा सामना सुरू होण्याआधीचा आहे. यामध्ये नेदरलॅंड्सचा फलंदाज टॉम कूपर बांगलादेशविरुद्ध नाणेफेक सुरू असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला म्हणतो की, "तुम्हीही आजचा सामना जिंका म्हणजे आम्ही चौथ्या स्थानावर राहू." नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेवर १३ धावांनी विजय मिळवल्याने पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे उघडले. त्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
पाकिस्तानच्या मदतीला नेदरलॅंड्स आला धावून
दक्षिण आफ्रिकेचा पराभव केवळ पाकिस्तानसाठी आवश्यक नव्हता तर नेदरलँडसाठीही तो खूप महत्त्वाचा होता. कारण यानंतर हे कॉम्बिनेशन केले जात होते की जर पाकिस्तानने बांगलादेशला हरवले तर नेदरलँड्स पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर येईल. जे त्यांना पुढील टी-२० विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यासाठी मदतशीर असेल. नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स सामन्यानंतर म्हणाला, "आणखी एक चांगला अनुभव आला, नेदरलँड्सच्या संघाने आणखी एक मोठी उलटफेर केली. पहिले दोन सामने गमावल्यानंतर, आमच्यासाठी लक्ष्य हे होते की आम्ही अजूनही पुढील विश्वचषकासाठी थेट पात्र होण्यासाठी खेळत आहोत. त्यामुळे दोन निकाल आमच्या बाजूने आले."
पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडक
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, विजयासाठी १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ केवळ १४५ धावा करू शकला. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला, तर पाकिस्तानने बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.