Join us

INDW vs SLW: श्रीलंकेला अवघ्या १०९ धावांवर गुंडाळले; आशिया चषकात भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया चषकातील पहिला सामना जिंकून भारतीय महिला संघाने विजयी सलामी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 16:26 IST

Open in App

Women’s Asia Cup 2022 । सिल्हेट : बांगलादेशच्या धरतीवर आजपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. पहिल्याच सामन्याच स्पर्धेचा प्रबळ दावेदार आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने होते. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात मोठा विजय मिळवून आशिया चषकात विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाने शानदार फलंदाजी करून श्रीलंकेसमोर १५१ धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या १०९ धावांवर सर्वबाद झाला. भारताने जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ६ बाद १५० एवढी धावसंख्या उभारली होती. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर श्रीलंकेचे फलंदाज चितपट झाले. 

भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच आक्रमक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजांवर दबाव टाकला. दयालन हेमलता हिने सर्वाधिक ३ बळी पटकावले. तर दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. राधा यादवने एक बळी पटकावून भारताच्या विजयाला हातभार लावला. भारतीय गोलंदाजांच्या शानदार प्रदर्शनामुळे भारताला ४१ धावांनी मोठा विजय मिळाला. श्रीलंकेचा संघ १८.२ षटकांत सर्वबाद केवळ १०९ धावा करू शकला. 

जेमिमा रॉड्रिग्जने ठोकले अर्धशतकतत्पुर्वी, श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघास प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली. सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना संघाच्या अवघ्या १३ धावा असताना बाद झाली तर २३ धावा असताना शेफाली वर्माच्या रूपात भारताला दुसरा झटका बसला. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने जेमिमा रॉड्रिग्जची साथ दिली. मात्र कौर ३० चेंडूत ३० धावा करून बाद झाली. तर जेमिमा रॉड्रिग्जने ५३ चेंडूत ७६ धावा केल्या. अखेरच्या काही षटकांमध्ये फलंदाजीला आलेली रिचा घोष अवघ्या ९ धावांवर ओशाडी रणसिंगे हिची शिकार झाली. लक्षणीय बाब म्हणजे जेमिमा रॉड्रिग्जने तिच्या खेळीत ११ चौकार आणि १ षटकार ठोकून भारताला मजबूत स्थितीत पोहचवले. 

श्रीलंकेकडून ओशाडी रणसिंगे हिने ३ बळी पटकावले तर सुगंधिका कुमारी आणि चामरी अथपथु या दोघींना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. या दोघींना वगळले तर कोणत्याच श्रीलंकन गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, दीप्ती शर्मा, दयालन हेमलता, पूजा वेस्त्राकर, स्नेह राणा, राधा यादव, रेणुका ठाकूर. 

७ संघांमध्ये रंगणार 'सामना' आजपासून अर्थात १ ऑक्टोबरपासून महिला आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. आयसीसीने अलीकडेच जाहीर केलेल्या फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला होता, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील २ आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी झाले आहेत. 

 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय महिला क्रिकेट संघबांगलादेशबीसीसीआय
Open in App