Join us

यंदाची विश्वचषक स्पर्धा एकदिवसीय क्रिकेटला वाचवेल?

एकदिवसीय क्रिकेटचा प्रकार काळाच्या पडद्याआड लोटताना दिसत आहे. या प्रकाराला निरोप देण्याची योजना आखली जात आहे, हे पाहणे थोडे विचित्र वाटते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 09:05 IST

Open in App

गौतम गंभीर 

एकदिवसीय क्रिकेटचा प्रकार काळाच्या पडद्याआड लोटताना दिसत आहे. या प्रकाराला निरोप देण्याची योजना आखली जात आहे, हे पाहणे थोडे विचित्र वाटते. एखाद्याला ‘जीवनगौरव’ पुरस्कार  दिला जात असताना त्या व्यक्तीवर भावनांचा  आणि कौतुकाचा वर्षाव केला जातो आणि त्यामागे संदेश असतो की, ‘खूप खूप धन्यवाद, तुमची वेळ संपलेली आहे.’ क्रिकेटच्या या प्रकाराला निरोप  देण्यास अशीच घाई झाली असावी. यंदाचा एकदिवसीय विश्वचषक  शेवटचा असू शकतो, असेही बोलले जात आहे.

एकदिवसीय प्रकार आकर्षक होणे आवश्यक आहे. ऑनलाइनच्या काळात प्रत्येक गोष्ट झटपट उपलब्ध होत असताना चाहत्यांना हा प्रकार कंटाळवाणा वाटत असावा. फोनवर रील पाहणे आणि इतर झटपट माहिती घेणे आवडत असले, तरी आम्ही चित्रपट पाहण्यासाठी मल्टिप्लेक्समध्ये तीन तास घालवतोच! याचा अर्थ असा की, सामग्री चांगली असेल तर कालमर्यादेची प्रासंगिकता लागू पडत नाही.

कर्णधारांच्या क्षमतेची परीक्षा

एकदिवसीय प्रकार हा खराब सुरुवातीनंतरही संघांना मोठ्या कामगिरीची संधी देतो. पॉवर प्ले गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत असला, तरी त्याला क्षमता सिद्ध करण्याची आशा असते. यंदाच्या विश्वचषकात कर्णधारांची परीक्षा होईल. तसेच, वर्णन करताना समालोचकांच्या क्षमतेचाही कस लागेल.

बॅट-चेंडूत हवे संतुलन

            शुभमन गिल, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर ही नावे गाजण्यास सज्ज आहेत. दुसरीकडे गोलंदाजांची अधिक स्तुती अपेक्षित आहे.

            आशिया चषक अंतिम सामन्यात लंकेचा ५० धावांत धुव्वा उडविल्यानंतर सिराज आणि बुमराह यांचे तोंडभरून कौतुक झाले. दोघांचा अचूक आणि भेदक मारा पाहणे चाहत्यांना खूप आवडले. पाटा खेळपट्टीवर खेळण्यापेक्षा बॅट आणि चेंडूत संतुलन साधण्यास हरकत नाही.

भारत-इंग्लंड दावेदार

भारताची कामगिरी एकदिवसीय क्रिकेटची लोकप्रियता टिकविण्यात मोलाची ठरेल. माझ्या मते भारत  आणि इंग्लंड हे संभाव्य विजेते आहेत.  टीम इंडियाने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतही स्वत:ला सिद्ध केले. तरीही बुमराहची तंदुरुस्ती आणि दव पडल्यावर ओल्या चेंडूने गोलंदाजी करण्याची क्षमता यावर भारताची वाटचाल अवलंबून असेल, असे माझे मत आहे.  मी विनंती करतो की, हा क्रिकेटचा हंगाम आहे, तेव्हा दसरा-दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी न करता क्रिकेटच्या फटाक्यांचा आनंद घ्या.

टॅग्स :ऑफ द फिल्डगौतम गंभीर