भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळावरून सध्या क्रीडा विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या ऐतिहासिक पराभवानंतर गंभीरवर टीका होत असतानाच, २०२६ च्या टी-२० विश्वचषकानंतर त्यांना पदावरून हटवले जाईल, अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
'स्पोर्टस्टार'ला दिलेल्या मुलाखतीत देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले की, लोकांच्या मतांचा आम्ही आदर करतो, पण निर्णय घेण्याची एक ठराविक पद्धत आहे. ते म्हणाले की, "१.४ अब्ज लोकांच्या या देशात प्रत्येकजण स्वतःला क्रिकेट तज्ज्ञ मानतो. हा लोकशाही देश असल्याने प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, बीसीसीआयकडे निर्णय घेण्यासाठी माजी क्रिकेटपटूंची एक समर्पित क्रिकेट समिती आणि पाच पात्र निवडकर्ते आहेत. कोणताही अंतिम निर्णय याच समित्यांकडून घेतला जातो."
गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय संघाने यशाची शिखरेही गाठली आणि काही मानहानीकारक पराभवांचाही सामना केला. भारताने गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आशिया कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. परंतु, न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर कसोटीत 'व्हाईटवॉश', कसोटीतील नीचांकी धावसंख्या (४६ धावा) आणि श्रीलंकेविरुद्ध २७ वर्षांनंतर एकदिवसीय मालिकेत भारताला पराभव स्वीकारला आहे. या पराभवांमुळेच गंभीरला प्रशिक्षकपदावरून हटवण्याची किंवा कसोटीसाठी वेगळा प्रशिक्षक नेमण्याची मागणी जोर धरत आहे.
मनोज तिवारीने काय म्हटले?
माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने गंभीरच्या भविष्यावर मोठे भाष्य केले आहे. "भारतीय संघ २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला, तर बीसीसीआयने प्रशिक्षकाला बदलण्याचा कठीण निर्णय घ्यायला हवा", असे तो म्हणाला.