IPL 2024, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये अखेर सूर गवसलेला दिसतोय. आयपीएल २०२४ मध्ये सलग ३ पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखालील MI ने वानखेडे स्टेडियमवरील सलग दोन सामने जिंकले आहेत. हार्दिककडे नेतृत्व दिल्यानंतर सुरू झालेल्या वादात आता नव्या वादाने डोकं वर काढलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विरुद्धच्या सामन्यात मोठ्या लक्षाचा सहज पाठलाग केल्यानंतर मुंबईचे चाहते आनंदीत झाले. पण, न्यूझीलंडचा माजी खेळाडू व समालोचक सायमन ड्यूल ( Simon Doull ) यांनी मोठा दावा केला आहे.
हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि त्यामुळे तो सामन्यांत पूर्ण ४ षटकं टाकत नाही, असा दावा ड्यूल यांनी केला. "तुम्ही पहिल्या सामन्यात पहिले षटक टाकून, मी आलोय असं जगाला दाखवलं. पण, अचानक गोलंदाजीपासून दूर झालात. तो जखमी आहे. मी तुम्हा सांगतोय की त्याच्याबाबतीत काहीतरी चुकीचं आहे. तो ते कबूल करत नाही, पण आहे. पण काहीतरी चुक आहे, हे नक्की. हे माझं गट फिलींग आहे,''असे ड्यूलने क्रिकबझशी बोलताना सांगितले.
ड्यूल यांच्या दाव्यावर नाव न सांगण्याच्या अटीवर मुंबई इंडियन्सच्या अधिकाऱ्याने मोठे अपडेट दिले आहेत. “ज्यापर्यंत त्याच्या गोलंदाजीचा संबंध आहे, तो संघ व्यवस्थापन आणि त्याचा कॉल आहे. ही मुळात संघाची रणनीती आहे. जेव्हा जेव्हा त्याला खेळाच्या परिस्थितीनुसार गोलंदाजी करणे आवश्यक असेल तेव्हा तो त्यापासून मागे हटणार नाही,” असे सूत्राने सांगितले.
“त्याचे सहकारी चांगले खेळत आहेत, मग कर्णधार कशाला त्यात बदल करेल. जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्झी आणि आकाश माढवाल चांगली गोलंदाजी करत आहेत. गरज भासल्यास हार्दिक पुढील सामन्यात गोलंदाजी करेल. दुखापतीची चिंता नाही,” असेही त्याने स्पष्ट केले.
११ एप्रिलला बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने एका षटकात १३ धावा दिल्या. दिल्ली कॅपिटल्स व राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने गोलंदाजी केली नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने एक विकेट घेतली खरी, परंतु त्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी बेक्कार धुलाई झाली.