Join us

Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

Rishabh Pant, Virat Kohli IND vs ENG: पंत स्वत: कुठल्या क्रमांकावर खेळणार, याचंही त्याने उत्तर दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 08:54 IST

Open in App

Rishabh Pant, Virat Kohli IND vs ENG: भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होत आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांच्या कसोटी निवृत्तीनंतरचा हा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे या दोघांच्या जागी कोणते खेळाडू खेळणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. रोहितच्या जागी शुबमनला कर्णधार करण्यात आले आहे. पण सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालसोबत केएल राहुलला संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. अशा वेळी चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या जागी फलंदाजीसाठी कोण येणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत याने या प्रश्नाचे अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

विराटच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोण?

भारतीय युवा संघ आता नव्याने तयार होत आहे. त्यामुळे या संघातील काही खेळाडूंच्या भूमिका बदललेल्या दिसतील. आधी जे खेळाडू धडाकेबाज खेळी करण्याचा प्रयत्न करायचे, ते आता कदाचित अधिक जबाबदारीने खेळण्याचा प्रयत्न करतील. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाची जागा खूप महत्त्वाची असते. सचिन तेंडुलकर आणि त्यानंतर विराट कोहली यांनी या स्थानावर फलंदाजी केली आहे. त्यांच्यानंतर या जागेवर कर्णधार शुबमन गिल फलंदाजी करताना दिसणार आहे. ऋषभ पंतने नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यात तो म्हणाला, "नंबर ३ वर कुणी खेळावे यावर अजूनही चर्चा सुरु आहे. पण नंबर ४ आणि ५ फिक्स आहे. शुबमन चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेन. बाकीच्या गोष्टींवर अजूनही चर्चा सुरु आहे."

टीम इंडियाशी विराटशी चर्चा

दरम्यान, एका व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला की, लीड्सच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्याआधी शुबमन गिल, रिषभ पंतसह संघातील अन्य खेळाडूंना विराट कोहलीने आपल्या लंडनस्थित निवासस्थानी बोलावले होते. इंट्रा स्क्वॉड लढतीनंतर भारतीय संघातील खेळाडूंना सुट्टी होती. याच दिवशी ही भेट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या भेटीचा नेमका उद्देश काय होता? कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दोन तास रंगलेल्या गप्पा गोष्टींच्या सत्रात विराट कोहलीनं इंग्लंड दौऱ्यावरील आव्हानाचा सामना कसा करायचा याच्या काही खास टिप्स नक्कीच दिल्या असतील, असे बोलले जातेय.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५रिषभ पंतशुभमन गिलविराट कोहली