Mahmudullah Bangladesh Cricket: क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि बांगलादेश यांच्यातील २०१६चा टी२० विश्वचषक सामना हा सर्वात थरारक सामन्यांपैकी एक मानला जातो. या सामन्यात बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर असतानाही पराभूत झाला होता. शेवटच्या ३ चेंडूत बांगलादेशला २ धावांची गरज होती. पण शेवटच्या तीन चेंडूत तीन गडी बाद झाले आणि भारताने सामना एका धावेने जिंकला. या पराभवाच्या १० वर्षांनंतर बांगलादेशचा अनुभवी खेळाडू महमुदुल्लाह याने त्या रात्री नक्की काय घडले होते, याबाबत सांगितले.
मैदानावर आणि हॉटेलमध्ये खेळाडूंना अश्रू अनावर
महमुदुल्लाहने एका मुलाखतीत सांगितले की, "त्या पराभवानंतर आम्ही पूर्णपणे खचलो होतो. मी, मुशफिकुर रहीम आणि संघातील इतर अनेक खेळाडू मैदानावरच रडायला लागले होते. हॉटेलवर परतल्यानंतरही परिस्थिती बदलली नाही; आम्ही आमच्या खोल्यांमध्ये रात्रभर रडत होतो. तो पराभव माझ्या मूर्खपणामुळे आणि चुकीमुळे झाला होता. सामन्याच्या शेवटच्या ३ चेंडूंवर आम्हाला विजयासाठी केवळ २ धावा हव्या होत्या. त्या क्षणी मला वाटले की एक मोठा फटका मारला की आपण जिंकू, पण तो विचार चुकीचा ठरला. मी शांतपणे एक धाव काढूनही सामना जिंकवून देऊ शकलो असतो."
धोनीची 'ती' चपळाई कामी आली
"भारताचा तेव्हाचा कर्णधार एमएस धोनीने शेवटच्या चेंडूवर मुस्तफिजुर रहमानला ज्या पद्धतीने धावबाद केले, त्याने बांगलादेशच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. महमुदुल्लाह म्हणाला, "त्या एका धावेने आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद हिरावला होता. या पराभवाच्या जखमा कधीही भरून येणार नाहीत. या घटनेने आम्हाला आयुष्यात एक मोठा धडा शिकवला. त्या रात्री आम्हाला खूप वाईट वाटले पण त्या पराभवाने आम्हाला शिकवले," असे भावूक उद्गार त्याने काढले.
काय घडले होते त्या सामन्यात?
भारताने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला शेवटच्या ३ चेंडूत २ धावांची गरज होती. मुशफिकुर रहीम आणि महमुदुल्लाह दोघेही सलग दोन चेंडूंवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाले. शेवटच्या चेंडूवर १ धाव हवी असताना धोनीने धावबाद करत भारताला १ धावेने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. महमुदुल्लाहचा हा खुलासा पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना त्या थरारक रात्रीची आठवण करून देणारा ठरला आहे.