मुंबई : भारतासारख्या क्रिकेट चाहत्यांच्या देशामध्ये लोकांच्या अपेक्षाचे ओझे अधिक असते, पण विराट कोहलीने कर्णधार म्हणून शानदार कामगिरी केली आहे, असे ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार अॅरोन फिंचने म्हटले आहे.
फिंच म्हणाला, खेळाडूंना निराशाजनक कालखंडातून जावे लागते, पण कोहली, स्टिव्ह स्मिथ, रिकी पॉन्टिंग आणि सचिन तेंडुलकरसारखे खेळाडू अपवाद असतात. सोनी टेनच्या पिट स्टॉप शोमध्ये फिंच म्हणाला, ‘प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत निराशाजनक कालखंड येतो, पण कोहली, स्मिथ, पॉन्टिंग आणि तेंडुलकरसारख्या खेळाडूंचा फॉर्म कधीच सलग दोन मालिकांमध्ये खराब राहिलेला नाही.’आयसीसीने चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यास बंदी घातली आहे. खेळाडूंना याची सवय होईल, असे फिंच म्हणाला. मी इंग्लंड किंवा वेस्ट इंडिज संघांसोबत चर्चा केलेली नाही, पण पुढील काही महिन्यांमध्ये खेळाडूंना याची सवय होईल. चेंडू चमकविण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पद्धती शोधल्या जातील.’
‘भारतातर्फे खेळण्याचे दडपण वेगळे आणि कर्णधारपदाचे वेगळे असते. कोहली ज्याप्रकारे दोन्ही भूमिका बजावत आहे, ते शानदार आहे. महेंद्रसिंग धोनीकडून नेतृत्व स्वीकारल्यानंतर विराटकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तो सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चांगला खेळत आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज आणि त्यानंतर कसोटी व टी-२० मध्ये त्या यशाची पुनरावृत्ती करणे प्रशंसेस पात्र आहे.’ - अॅरोन फिंच