सिडनी : भारतीय कसोटी संघाला रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांशिवाय इंग्लंडमध्ये २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ‘२००७ नंतर इंग्लिश खेळपट्ट्यांवर मालिका विजयाची चव चाखू न शकलेल्या भारताला यंदाच्या दौऱ्यात सुरुवातीला पराभवाचा धक्का बसल्यास निवृत्त झालेला विराट काेहली आपली निवृत्ती मागे घेऊ शकतो,’ असा दावा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने केला आहे.
या मालिकेत भारतीय संघाला विराटच्या अनुपस्थितीची उणीव भासू शकते, असेही क्लार्क आपल्या पॉडकाॅस्टमध्ये म्हणाला. सध्याचा भारतीय संघ मजबूत आहे. तो विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय इंग्लंडमध्ये जिंकू शकतो. पण जर या मालिकेत भारताचा दारुण पराभव झाला, तर विराट कोहली निवृत्ती मागे घेऊ शकतो.
कोहलीचे कसोटी क्रिकेटबद्दलचे प्रेम त्याच्या बोलण्यातून दिसते. जर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले, तर चाहते विराटला पुन्हा कसोटी खेळण्याची मागणी करू शकतात. अशा वेळी कर्णधार शुभमन गिल आणि निवड समितीने त्याच्याशी चर्चा केल्यास, विराट पुन्हा मैदानात दिसू शकतो. भारतीय क्रिकेट चाहते आपल्या संघाला विजयी पाहू इच्छितात, त्यामुळे अशी मागणी ते करू शकतात.’
२०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केलेल्या विराटने १२३ कसोटी सामने खेळून ९,२३० धावा केल्या. यामध्ये ३० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च खेळी २५४ धावा आहे. २०१५ ते २०२० या काळात त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आणि ४० कसोटी सामने जिंकून दिले.