Join us

खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...

Virat Kohli wrong phone call: विराट कोहली फोन का केला? पोलिसांना त्याच्या घरी का जावं लागलं? वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:39 IST

Open in App

Virat Kohli Rajat Patidar phone call: तुम्हाला जर विराट कोहली किंवा एबी डीव्हिलियर्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा फोन आला तर .... तुम्हालाही असंच वाटेल की आपल्याशी कुणीतरी मस्करी करतंय की काय.... असेच काही फोन छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील मडगाव गावातील रहिवासी मनीष बिसी याला आले. पण ते फोन करणारे खरेखुरे स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स हेच होते. या दोघांनी या पानटपरीवाल्याला फोन का केला, त्याच्याशी काय बोलले.... जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारच्या एका चुकीमुळे एक तरुण रातोरात स्टार बनला. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील मडगाव गावातील रहिवासी मनीष बिसीने एक सिम खरेदी केले होते. हा नंबर आधी रजत पाटीदारचा होता, जो रिचार्ज न झाल्यामुळे डिस्कनेक्ट झाला. त्यानंतर मनीषला विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या दिग्गजांकडून कॉल येऊ लागले. जेव्हा मनीष आणि त्याचा मित्र खेमराज यांनी व्हॉट्सअप इन्स्टॉल केले, तेव्हा रजत पाटीदारचा फोटोदेखील त्याच्या डीपीमध्ये होता.

उलगडा कसा झाला?

२८ जून रोजी शेतकरी गजेंद्र बिसी यांचा मुलगा मनीष याने गावापासून सुमारे ८ किमी अंतरावर असलेल्या देवभोग येथील एका मोबाईल दुकानातून नवीन जिओ सिम खरेदी केले. त्यानंतर त्याला कोहली, डिव्हिलियर्स आणि यश दयाल यांचे फोन आले. त्याला वाटले की कोणीतरी त्याची थट्टा करत आहे. १५ जुलै रोजी रजत पाटीदार याने स्वतः त्याच्या जुन्या नंबरवर फोन करून त्याला सांगितले की, "भाऊ, माझे सिम कार्ड परत दे". त्यावेळी सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला.

मनीष आणि खेमराज यांना अजूनही ही केवळ मस्करी वाटत होती. पाटीदारने या दोघांना थोडाशा कडक स्वरात सांगितले आणि पोलिसांना पाठवणार असल्याचेही सांगितले. तरीही त्यांना हा विनोद वाटत होता. पण काही मिनिटांनंतर, खरंच पोलिसांचे पथक आले आणि त्यांनी हा घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

पोलीस काय म्हणाले?

गरियाबंदच्या पोलिस उपअधीक्षक नेहा सिन्हा म्हणाल्या की, दूरसंचार धोरणानुसार, ९० दिवसांच्या क्रियाकलापानंतर सिम निष्क्रिय करण्यात आले आणि तो एका नवीन ग्राहकाला देण्यात आला. मनीषला हे सिम मिळाले. मनीषला प्रत्यक्षात रजत पाटीदारच्या संपर्कात असलेल्या क्रिकेटपटूंचे फोन येत होते. पाटीदारने मध्य प्रदेश सायबर सेलला कळवले की त्याचा नंबर दुसऱ्या कोणालातरी देण्यात आला आहे आणि तो परत मिळवण्याची विनंती केली.

त्यानंतर उपअधीक्षकांनी सांगितले की मध्य प्रदेश सायबर सेलने गरियाबंद पोलिसांशी संपर्क साधला. ते मनीष आणि त्याच्या कुटुंबाशी बोलले आणि त्यांच्या संमतीने, सिम कार्ड अलीकडेच पाटीदारला परत करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, कोणाचीही कायदेशीर समस्या किंवा चूक नव्हती. सिम वाटप प्रक्रियेचा परिणाम म्हणून असे घडले.

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरएबी डिव्हिलियर्सपोलिस