Ruturaj Gaikwad Lead Maharashtra Are Into The Semis In Vijay Hazare Trophy : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर रगंलेल्या तिसऱ्या क्वार्टर फायनल लढतीत पंजाब विरुद्ध ७० धावांनी विजय नोंदवत महाराष्ट्राच्या संघानं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. १२ जानेवारीला विदर्भ विरुद्ध राजस्थान यांच्यात दुसरा क्वार्टर फायनल सामना रंगणार आहे. यांच्यातील विजेता सेमीफायनलमध्ये महाराष्ट्र संघाविरुद्ध खेळताना दिसेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्शिनची सेंच्युरी, अंकित अन् निखिलची कडक फिफ्टी, महाराष्ट्राच्या संघानं सेट केलं होतं २७६ धावांचे टार्गेट
पहिल्यांदा फलंदाजी करताना महाराष्ट्र संघानं अर्शिन कुलकर्णीच्या १०७ (१३७) शतकी खेळीनंतर अंकित बावने ६० (८५) अन् निखिल नाईक ५२ (२९) यांनी केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित ५० षटकात संघाच्या धावफलकावर ६ बाद २७५ धावा लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ २०५ धावांत गारद झाला.
गोलंदाजीत मुकेश चौधरीनं केली हवा
२७६ धावांचा पाठलाग करताना मुकेश चौधरीनं पंजाबच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजीला सुरुंग लावला. प्रभसिमरन सिंग १४ (१७), अभिषेक शर्मा १९ (१६) आणि नेहाल वढेरा ६ (११) या तीन मॅच विनर खेळाडूंना मुकेश चौधरीनं आपल्या पहिल्या स्पेलमध्येच तंबूचा रस्ता दाखवला. त्याचा हाच स्पेल पंजाबला भारी पडला. त्याने दिलेल्या या तगड्या धक्यातून संघ काही सावरला नाही. अनमोलप्रित सिंग याने ७७ चेंडूत केलेल्या ४८ धावा आणि तळाच्या फलंदाजीत अर्शदीप सिंगनं ३९ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने केलेली ४९ धावांची खेळी वगळता पंजाबच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी संघाचा डाव ४४.४ षटकात २०५ धावांवर आटोपला.