Vaibhav Suryavanshi Century, Rahul Dravid IPL 2025: राजस्थान रॉयल्सचा 'छोटा उस्ताद' वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेत आहे. नुकताच पंजाबविरूद्धच्या सामन्यानंतर प्रिती झिंटाने त्याचे कौतुक केले. तसेच मंगळवारी तो भरमैदानात सामन्यानंतर धोनीच्या पाया पडला. त्यामुळे त्याची वाहवा केली जात आहे. वैभवचा हा पहिलाच हंगाम आहे. या हंगामात जयपूरच्या मैदानात रंगलेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने शतक ठोकले. आयपीएलच्या इतिहासात भारतीय फलंदाजाने केलेले हे सर्वात जलद शतक ठरले. याआधी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावे होता. त्याने ३७ चेंडूत शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले होते. पण वैभवने ३५ चेंडूत शतक ठोकत नवा विक्रम रचला होता. या वैभवला तब्बल ५०० मिस्ड कॉल आले असल्याचे उघड झाले. हे कॉल्स कुणाचे, जाणून घेऊया.
वैभव सूर्यवंशीला आले ५०० 'मिस्ड कॉल'
वैभवने जेव्हा दमदार शतक ठोकले तेव्हा सारेच लोक त्याचे कौतुक करत होते. त्यावेळी वैभव सूर्यवंशीला नेमका कसा अनुभव आला याबद्दल राहुल द्रविडने त्याला विचारले. राहुल द्रविडने वैभव सूर्यवंशीला विचारले की आयपीएलमध्ये शतक केल्यानंतर त्याला किती कॉल आले? यावर वैभवने सांगितले की, त्याला अनेक लोकांचे फोन येत होते, त्यामुळे त्याने त्याचा फोन बंद केला होता. नंतर जेव्हा त्याने त्याचा फोन तपासला तेव्हा त्यात ५०० मिस्ड कॉल होते. याचा अर्थ असा की ज्या लोकांनी वैभव सूर्यवंशी यांना ५०० कॉल केले, ते त्याचे चाहते आणि हितचिंतक होते, असे द्रविड म्हणाला.
वैभवने मोडला होता १५ वर्ष जुना रेकॉर्ड
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. २०१३ च्या हंगामात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून खेळताना पुणे वॉरियर्स विरुद्ध ३० चेंडूत शतक झळकावले होते. त्या पाठोपाठ आता वैभव सूर्यंवशीचा नंबर लागतो. त्याने ३५ चेंडूत शतक साजरे केले. १४ वर्षाच्या या पोराने १५ वर्षांपासून अबाधित असणारा युसूफ पठाणचा रेकॉर्ड मोडीत काढला. युसूफ पठाणने राजस्थानकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरूद्ध २०१०च्या हंगामात ३७ चेंडूत शतक झळकावले होते.