सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने "हिस्ट्री करेंगे रिपीट..करेंगे" हा नारा सत्यात उतरवत इतिहास रचला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
घरच्या मैदानात हिटमॅन रोहित शर्माचा वारसा जपत इतिहासाची पुनरावृत्ती केल्यावर सूर्यकुमार यादव चांगलाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याची कृती बारबाडोसच्या मैदानात रोहित शर्माने ज्या अंदाजात जेतेपदानंतर भावना व्यक्त केल्या होत्या त्या क्षणाच्या आठवणीला उजाळा देणाऱ्या होत्या.
सूर्याचं यश पाहून हिटमॅन रोहितही भारावला भारतीय संघाने १९ नोव्हेंबर २०२३ मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल खेळली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पुन्हा तेच घडणार का? अशी चर्चा रंगली होती. पण ज्या मैदानातील पराभवानंतर रोहित खचला होता तिथं सूर्यानं रोहितची वारसा जपत संघाला जेतेपद मिळवून दिलं. त्याचं यश पाहून रोहित शर्माही भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर टीम इंडियाला पहिले जेतेपद मिळवून देणारा एमएस धोनीची प्रतिक्रियाही लक्षवेधी ठरली.
भारत बनला चैंपियन | IND v NZ T20 WC Final Match Highlights
वर्ल्ड कप जिंकणाऱ्या मोजक्या कर्णधारांच्या यादीत सूर्याची वर्णी
कपिल देव यांनी १९८३ मध्ये भारतीय संघाला पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकत पुन्हा एकदा जगावर मोहोर उमटवली. पुढे रोहित शर्मा याने २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जिंकून देत भारतीय चाहत्यांचे स्वप्न पूर्ण केले. आता त्या यादीत सूर्यकुमार यादवचा समावेश झाला आहे. रोहित शर्माचा वारसा जपत त्याने संघाला चॅम्पियन करत नवा इतिहास रचला आहे.