भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याची घोषणा केली. भारतीय संघ जुलै २०२६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. सर्व सामने हरारे येथे खेळले जातील. पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २३ जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळला जाईल. उर्वरित दोन सामने देखील २५ आणि २६ जुलै रोजी त्याच मैदानावर खेळले जातील. याचा अर्थ भारतीय संघ सलग दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळेल. महत्त्वाचे म्हणजे, झिम्बाब्वेचा दौरा करण्याआधी भारतीय संघ अफगाणिस्तान, आयर्लंड आणि इंग्लंडशी दोन हात करणार आहे.
अफगाणिस्तानसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका
आयपीएल २०२६ संपल्यानंतर भारतीय संघ सर्वप्रथम अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळेल. अफगाणिस्तानचा संघ भारताचा दौरा करेल. एकमेव कसोटी सामना ६ जूनपासून न्यू चंदीगड येथे खेळला जाईल. पहिला एकदिवसीय सामना १४ जून रोजी धर्मशाला येथे खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना १७ जून रोजी लखनौ येथे आणि तिसरा सामना २० जून रोजी चेन्नई येथे खेळला जाईल.
आयर्लंड आणि इंग्लंड दौरा
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर, भारतीय संघ जून-जुलैमध्ये आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा करेल. आयर्लंडमध्ये, भारतीय संघ दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळेल. पहिला सामना २६ जून रोजी आणि दुसरा २८ जून रोजी खेळला जाईल. दोन्ही सामने बेलफास्ट येथे खेळले जातील. त्यानंतर संघ इंग्लंडचा दौरा करेल, जिथे ते पाच टी-२० आंतरराष्ट्रीय आणि तीन एकदिवसीय सामने खेळतील. पहिला टी२० सामना १ जुलै रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे, दुसरा टी२० सामना ४ जुलै रोजी मँचेस्टर येथे आणि तिसरा टी२० सामना ७ जुलै रोजी नॉटिंगहॅम येथे खेळला जाईल. चौथा टी२० सामना ९ जुलै रोजी ब्रिस्टल येथे आणि अंतिम टी२० सामना ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळला जाईल.
झिम्बाब्वेविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल. पहिला एकदिवसीय सामना १४ जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे, दुसरा १६ जुलै रोजी कार्डिफ येथे आणि तिसरा १९ जुलै रोजी लॉर्ड्स येथे खेळला जाईल. दरम्यान, टी२० संघ झिम्बाब्वेमध्ये दाखल होईल आणि इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर, संघ झिम्बाब्वेविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळेल.
झिम्बाब्वेविरुद्धची टी२० मालिका महत्त्वाची का?
भारतीय संघाने शेवटचा झिम्बाब्वे दौरा २०२४ मध्ये केला होता, जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळली गेली होती. ही मालिका युवा खेळाडूंसाठी एक संधी ठरू शकते. २०२८ च्या टी-२० विश्वचषक आणि २०२८ च्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी संघ संयोजनावर काम केले जाईल. तसेच, राखीव खेळाडूंची ताकद तपासण्याची ही एक चांगली संधी असेल.