India vs Pakistan T20 World Cup 2026: भारतीय संघाने टी२० विश्वचषकाचे पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा (यूएसए) २९ धावांनी पराभव केला. त्यानंतर नामिबियावर ९३ धावांनी मोठा विजय मिळवला. त्यामुळे भारतीय संघ अ गटात गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ आता रविवारी तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे. पण त्याआधी भारताला एका कमकुवतपणावर मात करावी लागणार आहे.
भारतीय संघाची डोकेदुखी काय?
सलामीवीर इशान किशनने संघाला चांगली सुरुवात करून दिली, त्याने दुसऱ्या सामन्यात फक्त २४ चेंडूत ६१ धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये विरोधी गोलंदाजांवर पूर्ण दबाव कायम ठेवला आणि जलद धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पंड्यानेही ५२ धावांची स्फोटक खेळी केली. पण शेवटच्या षटकांमध्ये धावा खूपच आटल्या. शिवम दुबे (२३ धावा), रिंकू सिंग (१ धावा) आणि अक्षर पटेल (० धावा) यांची फलंदाजीमध्ये अपेक्षेनुसार कामगिरी दिसली नाही. पहिल्या सामन्यात तर कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ८४ धावा करून संघाला चांगली धावसंख्या गाठून दिली. परंतु वरच्या, मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांची मोठी भागीदारी झालीच नाही. दोन्ही सामन्यांतील हाच पॅटर्न संघासाठी डोकेदुखी ठरू शकते.
काय करणे आवश्यक?
पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध आहे, जो नेहमीच चर्चेतील सामना असतो. भारताच्या काही फलंदाजांच्या कामगिरीत कमकुवतपणा दिसून आला. पण गोलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडू संघासाठी मोठा दिलासा ठरले. त्यांच्यामुळे भारताला सहज विजय मिळवता आले. वेगवान गोलंदाजांनी नवीन चेंडूने सुरुवातीच्या विकेट मिळवल्या, तर फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये विरोधी संघाची धावगती रोखली. तसेच अष्टपैलू खेळाडूंच्या उपस्थितीमुळे संघाचे संतुलन राखले गेले. पण फलंदाजीमध्ये प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची स्पष्टता आवश्यक आहे. जर वरची फळी डगमगली तर पुढील फलंदाजांना जबाबदारीने खेळावे लागेल. तसेच डेथ ओव्हर्समध्ये स्ट्राइक रोटेशन आणि मोठ्या फटकेबाजीच्या रणनीतीवरही काम करावे लागेल.