टी-२० विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी नवव्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. या सामन्यातील भारताच्या 'मास्टर प्लॅन'चे पाच प्रमुख पैलू खालीलप्रमाणे आहेत:
उस्मान तारिकच्या अॅक्शनचा सराव
पाकिस्तानचा रहस्यमयी गोलंदाज उस्मान तारिकचा सामना करण्यासाठी टीम इंडियाने अनोखी पद्धत शोधली आहे. सराव सत्रात खुद्द कर्णधार सूर्याने तारिकच्या अॅक्शनने गोलंदाजी करून फलंदाजांना सराव करून दिला. यामुळे तारिकचे 'सरप्राईज एलिमेंट' संपवण्याचा गंभीरचा प्रयत्न आहे.
बाबर आझमची संथ फलंदाजी ठरणार भारताचे शस्त्र
बाबर आझमचा टी-२० मधील स्ट्राईक रेट (१३०) आणि भारताविरुद्धची सुमार कामगिरी (१०५ धावा) पाहता, भारतीय गोलंदाज त्याला जास्तीत जास्त वेळ क्रीजवर ठेवण्याची रणनीती आखू शकतात. बाबर जेवढा जास्त वेळ खेळेल, तेवढा पाकिस्तानचा धावगती कमी राहील.
शाहीन आफ्रिदीवर पहिल्या चेंडूपासून हल्ला
पाकिस्तानचा हुकमी एक्का मानला जाणारा शाहीन आफ्रिदी सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. नेदरलँड्स आणि अमेरिकेविरुद्ध तो महागडा ठरला आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज पहिल्याच षटकापासून त्याच्यावर तुटून पडतील, जेणेकरून तो दबावाखाली येईल आणि आपली लय गमावेल.
फिरकी त्रिकुटाचा 'चक्रव्यूह'
कोलंबोची खेळपट्टी फिरकीला पोषक असल्याने गौतम गंभीर वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या तिघांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची कमकुवत मधली फळी या फिरकीच्या जाळ्यात अडकवण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे.
मानसिक दबाव
गंभीरच्या रणनीतीचा एक भाग म्हणून पाकिस्तानवर प्रचंड मानसिक दबाव आणला जाणार आहे. अगदी नाणेफेकीच्या वेळी सूर्या पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन टाळतो का, इथपासून ते मैदानावरील आक्रमकतेपर्यंत सर्व गोष्टींचा वापर पाकिस्तानला विचलित करण्यासाठी केला जाऊ शकतो.