भारतीय महिलांनी पहिल्याच ACC Women's Emerging Teams Asia Cup स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. अंतिम सामन्यात भारताच्या 9 बाद 175 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 135 धावांत माघारी परतला. भारताकडून कर्णधार देविका वैद्य आणि तनुजा कन्वर यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेत विजयात मोठा वाटा उचलला. श्रीलंकेकडून हर्षिता समरविक्रमानं सर्वाधिक 39 धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. पावसाच्या व्यत्ययामुळे लंकेपुढे 150 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण, भारतानं हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 15 धावांनी जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघानं तनुश्री सरकार आणि सिमरन बहादूर यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर 175 धावा केल्या. भारताची सुरुवात निराशाजनक झाली होती. भारताचा निम्मा संघ 54 धावांत माघारी परतला होता. पण, तनुश्रीनं 75 चेंडूंत 4 चौकारांसह 47 धावांची खेळी केली. तिला सिमरनने 34 धावा करून उत्तम साथ दिली. भारताने 50 षटकांत 9 बाद 175 धावांचा पल्ला गाठला.
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा निम्मा संघ 43 धावांत माघारी परतला होता. हर्षितानं एक बाजू खिंड लढवताना संघाच्या विजयाच्या आशा कायम राखल्या होत्या. पण, देविका व तनुजा यांच्या गोलंदाजीसमोर लंकन फलंदाजांनी शरणागती पत्करली.