बांगलादेशला पाठिंबा देत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडण्याची पोकळ धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी आता नवी नौटंकी सुरु केली आहे. संघ निवडीनंतरही पाकिस्तान टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणं तळ्यात मळ्यात असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या स्पर्धेत खेळण्यासंदर्भातील अंतिम निर्णय सरकार घेईल, असे सांगत पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं स्पर्धेतील सहभागाबद्दल संभ्रम निर्माण केला. पण आता संघातील खेळाडूंची तिकीटे बुक केल्यानंतर पाक संघ स्पर्धेसाठी सज्ज झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पण पाकिस्तानचा संघ आता भारतीय संघाविरुद्धच्या हायहोल्टेज लढतीवर बहिष्कार टाकणार असल्याची गोष्ट चर्चा रंगू लागली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानची नवी नौटंकी, भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकणार?
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत १५ फेब्रुवारी, २०२६ रोजी नियोजित आहे. हा सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. बांगलादेशसोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी पाकिस्तान संघ भारतीय संघाविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याचा डाव आखत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी या प्रस्तावाबाबत आणि त्याचे संभाव्य परिणाम यांची माहिती पंतप्रधान शहबाज शरीफ यांना दिल्याचं समजतं.
IND vs NZ 5th T20 : घरच्या मैदानात संजू सॅमसनसाठी शेवटची संधी? खेळला तर ठीक नाहीतर...
बहिष्कार टाकून ICC च्या कारवाई पासून बचावासाठी खेळणार हा डाव
जर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्याचा बहिष्कार केला, तर ICC आणि ब्रॉडकास्टर्सकडून कारवाईचा धोका निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानवर बंदी किंवा दंडही होऊ शकतो. त्यामुळेच पाकिस्तान या शिक्षेपासून वाचण्याचा मार्ग शोधत आहे. पाकिस्तानच्या 'द डॉन'मधील सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, संपूर्ण स्पर्धेचा बहिष्कार ही प्राथमिकता नाही. मात्र पाकिस्तान १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा ग्रुप सामना टाळू शकते. यासाठी पीसीबीकडे ठोस कारणं आहेत, ज्याच्या आधारे ते ICC कडून होणाऱ्या बंदी किंवा दंडापासून बचाव करू शकतात." पीसीबी हा निर्णय बोर्डचा नसून सरकारचा असल्याचं ICC समोर मांडू शकते. हे कारण दाखवून ते ICC च्या कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्याचा प्लॅन शिजत आहे.
ICC अन् BCCI समोर निभाव लागणं मुश्कीलच
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अनेकदा अशा प्रकारचे भाष्य करण्यात आले आहे. पण त्यांनी आपल्या भूमिकावर ठाम राहून कधीच शब्द पाळलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानचा हा डावही यशस्वी होईल, असे वाटत नाही. जरी पाकिस्तानने हा डाव खेळला तरी ICC आणि BCCI समोर ते जिंकणं मुश्किलच आहे.