नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बांगलादेशला वगळून त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून वगळल्यानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला होता. या ताठर भूमिकेचा फटका बांगलादेशला बसला आहे. बीसीबीने आपले सामने श्रीलंकेत हलवावेत किंवा आयर्लंडसोबत गट बदलावा, अशी मागणी केली होती. मात्र, आयसीसीने गट बदलण्याची मागणी स्पष्टपणे फेटाळली होती.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शुक्रवारी दुबईत उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांना ईमेलद्वारे या निर्णयाची माहिती देण्यात आली. आयसीसीच्या एका सूत्राने सांगितले की, 'बीसीबी'ने २४ तासांच्या आत आयसीसीला अधिकृत उत्तर दिले नाही, उलट त्यांनी त्यापूर्वीच ढाका येथे पत्रकार परिषद घेतली, जे प्रोटोकॉलचे उल्लंघन होते. त्यामुळे आता त्यांच्या जागी स्कॉटलंडचा संघ खेळेल.
पाकिस्तानची सावध भूमिका आयसीसी बैठकीत बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवण्याच्या मागणीला पाठिंबा देणारा पाकिस्तान हा एकमेव देश होता. याबाबत पीसीबीचे प्रमुख मोहसिन नकवी म्हणाले, बांगलादेशवर अन्याय झाला आहे. पाकिस्तान संघाच्या बहिष्काराबाबत पंतप्रधान परतल्यावर आम्ही त्यांचा सल्ला घेऊ. सरकारचा निर्णय हा अंतिम असेल. सरकारने नकार दिला, तर आयसीसी दुसऱ्या कोणत्याही संघाला आमंत्रित करू शकते.
१४-२ मतांनी निर्णय अन् २४ तासांची मुदत
बांगलादेश संघाने टी-२० विश्वचषकाचे सामने भारतातच खेळावे यासाठी आयसीसी बोर्डच्या बैठकीत बांगलादेशविरुद्ध १४-२ अशा एकतर्फी बहुमताने निर्णय मंजूर झाला होता.
आयसीसीने बीसीबीला आपली भूमिका बदलण्यासाठी २४ तासांची मुदत दिली होती. मात्र, बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने या क्रिकेटवेड्या देशाच्या विश्वचषक खेळण्याच्या आशा मावळल्या.
स्कॉटलंडचे वेळापत्रक
७ फेब्रुवारी : विरुद्ध वेस्ट इंडिज (कोलकाता)
९ फेब्रुवारी : विरुद्ध इटली (कोलकाता)
१४ फेब्रुवारी : विरुद्ध इंग्लंड (कोलकाता)
१७ फेब्रुवारी : विरुद्ध नेपाळ (मुंबई)
५ लाख अमेरिकन डॉलर्सची फी गमवावी लागणार
१. सुरक्षा मूल्यांकनानुसार बांगलादेशला धोका कमी ते मध्यम स्वरूपाचा होता, जो इतर संघांसाठी समान आहे. मात्र, आसिफ नजरुल यांनी अंतरिम सरकारचे प्रतिनिधी म्हणून संघ भारतात जाऊ शकत नाही, असा हुकूम काढला. खेळाडूंसोबत झालेली बैठकही एकतर्फी ठरली.
२. या निर्णयाचा बीसीबीवर मोठा आर्थिक परिणाम होणार आहे. सहभागी संघांना मिळणारी ५ लाख अमेरिकन डॉलर्सची फी त्यांना गमवावी लागेल. आयसीसीकडून मिळणारा वार्षिक महसूल (सुमारे ३३० कोटी बांगलादेशी टका किंवा २७ दशलक्ष डॉलर्स), जो त्यांच्या वार्षिक बजेटचा ६० टक्के आहे, तोही धोक्यात आला आहे.
३. याशिवाय प्रायोजकांकडून मिळणाऱ्या रकमेचेही नुकसान होईल. बीसीबीने आयसीसीच्या विवाद निवारण समितीकडे धाव घेतली होती, पण ती याचिका ऐकली जाणार नाही. आता बीसीबीकडे स्वित्झर्लंडमधील लवाद न्यायालयात जाण्याचा एकमेव कायदेशीर मार्ग उरला आहे, तरीही स्पर्धा नियोजित वेळेतच सुरू राहील.