आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याचा निकाल कोणाच्याही बाजूने लागला, तरी क्रिकेटच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची नोंद होणार हे निश्चित आहे. एकीकडे भारतीय संघ तिसऱ्या जेतेपदासाठी मैदानात उतरेल, तर दुसरीकडे न्यूझीलंड आपला पहिला विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज असेल. भारताला २०१४ मध्ये श्रीलंकेने, तर न्यूझीलंडला २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपदापासून रोखले होते. आता २०२६ च्या या ऐतिहासिक महामुकाबल्यात कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
भारताकडे जागतिक विक्रम करण्याची संधी
भारतीय संघाने आतापर्यंत दोन वेळा (२००७ आणि २०२४) टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. जर भारताने हा अंतिम सामना जिंकला, तर तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत जगातील पहिला संघ ठरेल. सध्या भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या तिन्ही संघांने प्रत्येकी दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे.
न्यूझीलंडसाठी दुष्काळ संपवण्याची वेळ
न्यूझीलंडच्या संघाने आजवर अनेकदा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. परंतु, त्यांना एकदाही टी-२० विश्वचषक उंचावता आलेला नाही. २०२१ च्या विश्वचषकात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे, यंदाचा सामना जिंकल्यास न्यूझीलंड पहिल्यांदाच विश्वविजेता बनून नवा इतिहास घडवेल.
टी-२० विश्वचषक विजेत्यांची यादी (२००७ - २०२४)
| वर्ष | विजेता संघ | उपविजेता संघ |
| २००७ | भारत | पाकिस्तान |
| २००९ | पाकिस्तान | श्रीलंका |
| २०१० | इंग्लंड | ऑस्ट्रेलिया |
| २०१२ | वेस्ट इंडिज | श्रीलंका |
| २०१४ | श्रीलंका | भारत |
| २०१६ | वेस्ट इंडिज | इंग्लंड |
| २०२१ | ऑस्ट्रेलिया | न्यूझीलंड |
| २०२२ | इंग्लंड | पाकिस्तान |
| २०२४ | भारत | दक्षिण आफ्रिका |