Pakistan Cricket, PM Modi: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी आणि बीसीसीआयशी वाकड्यात जाऊन स्वतःसाठी मोठी समस्या निर्माण केली आहे. पाकिस्तानने २०२६ च्या आयसीसी टी२० विश्वचषकात भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय, त्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे पाकिस्तानची स्थानिक टी२० लीग PSL देखील उद्ध्वस्त होऊ शकते. यादरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि माजी पीसीबी प्रमुख रमीझ राजा (Ramiz Raza) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी क्रिकेट याबाबत बोलताना दिसत आहे.
तर पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त होईल
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रमीझ राजा म्हणाले, "पाकिस्तान बोर्डाला आयसीसीकडून ५०% निधी मिळतो. आयसीसी स्पर्धा आयोजित करते आणि नफा त्यांच्या बोर्ड सदस्यांमध्ये वितरित करते. आयसीसीचा ९०% निधी हा भारतीय क्रिकेट बाजारपेठेतून येतो. म्हणजे एक प्रकारे, भारतीय व्यावसायिक पाकिस्तान क्रिकेट चालवत आहेत. जर उद्या भारतीय पंतप्रधानांनी निर्णय घेतला की आम्ही पाकिस्तानला निधी देणार नाही, तर हे क्रिकेट बोर्ड उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल. बीसीसीआयवरील आपले अवलंबून राहणे दरवर्षी १०% कमी झाले पाहिजे," असे रमीझ राजा म्हणाले.
दरम्यान, टी२० विश्वचषकात जर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातला, तर त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि त्यांचे सदस्यत्व निलंबितही होऊ शकते हे स्पष्ट आहे. त्यामुळे अहवाल असे सूचित करतात की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या मुद्द्यावर इतर क्रिकेट बोर्डांकडून पाठिंबा मागत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी इतर क्रिकेट बोर्डांच्या अधिकाऱ्यांना त्यांचा पाठिंबा मागण्यासाठी फोन केला, परंतु सर्वांनी नकार दिला. आता प्रश्न असा आहे की पाकिस्तान पुढे काय करेल? कारण असे दिसते की लवकरच त्याला आपल्या निर्णयावर यू-टर्न घ्यावा लागेल.