T20 World Cup 2024 IND vs BAN Live Marathi : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. Super 8 मध्ये सलग दोन विजय मिळवून टीम इंडिया ४ गुणांसह ग्रुप १ मध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे. भारताचा सुपर ८मधील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ जूनला होणार आहे. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला पराभूत केले आहे आणि उद्या अफगाणिस्तानविरुद्धची लढत जिंकून त्यांना उपांत्य फेरीचे तिकिट निश्चित करता येणार आहे. बांगलादेशने दोन पराभवांमुळे स्पर्धेबाहेर जाण्याचा मार्ग निश्चित केला आहे. जर अफगाणिस्तानने उद्या धक्कादायक निकाल लावला, तर भारताला उपांत्य फेरीतील स्थान पक्कं करण्यासाठी वाट पाहावी लागेल. 
रोहित शर्मा ( २३) व विराट कोहली ( ३७) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यापासून वंचित राहिले. रिषभ पंतने ( ३६) फॉर्म कायम राखला, परंतु चुकीच्या फटक्याने पुन्हा त्याचा घात केला. सूर्यकुमार यादव ( ६) अपयशी ठरला असला तरी शिवम दुबेला ( ३४) गवसलेला सूर दिलासा देणारा ठरला.  हार्दिक पांड्या व शिवम दुबे यांनी ३४ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली. हार्दिकने २७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५० धावा केल्या आणि भारताला ५ बाद १९६ धावांपर्यंत पोहोचवले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ११ वेळा १८० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम भारताने नावावर केला आणि इंग्लंडला ( १०) मागे टाकले.  
फलंदाजीत कमाल केल्यानंतर हार्दिकने बांगलादेशचा सलामीवीर लिटन दास ( १३) याला माघारी पाठवले. सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर 
कुलदीप यादवने बांगलादेशचा सेट फलंदाज तनझिद हसनला ( २९) बाद केले. बांगलादेशने १० षटकांत २ बाद ६७ धावा केल्या होत्या आणि त्यांना  शेवटच्या १० षटकांत १३० धावा करायच्या होत्या. कुलदीपने आणखी दोन धक्के देताना तौवहिद हृदय ( ४) आणि शाकिब अल हसन ( ११) यांना माघारी पाठवले.  कुलदीपने ४ षटकांत १९ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. कुलदीपच्या स्पेलने बांगलादेशच्या हातून सामना निसटला आणि त्यांना शेवटच्या पाच षटकांत ८९ धावा हव्या होत्या. 
रोहितने प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पुन्हा आणले आणि त्याने नजमुल होसैन शांतो ( ४०) याला बाद करून बांगलादेशची अवस्था ५ बाद १०९ अशी केली. अर्शदीप सिंगने १७व्या षटकात जाकेर अलीला ( १) बाद केले. बुमराहने पुन्हा एकदा अप्रतिम स्पेल टाकून विजयात महत्त्वाची भूमिका वटवली. बुमराहने ४ षटकांत १३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. बांगलादेशला २० षटकांत ८ बाद १४६ धावा केल्या. अर्शदीपनेही दोन विकेट्स घेतल्या.