टी-२० मालिका : जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची उत्सुकता

नववर्षात भारतीय संघाचा पहिला दौरा टी-२० मालिकेद्वारे श्रीलंकेविरुद्ध आज, रविवारपासून सुरू होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 06:02 IST2020-01-05T06:01:50+5:302020-01-05T06:02:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
T-1 Series: Jasprit Bumrah eager to return | टी-२० मालिका : जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची उत्सुकता

टी-२० मालिका : जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची उत्सुकता

गुवाहाटी : नववर्षात भारतीय संघाचा पहिला दौरा टी-२० मालिकेद्वारे श्रीलंकेविरुद्ध आज, रविवारपासून सुरू होत आहे. या सामन्याच्या निमित्ताने सर्वांच्या नजरा असतील त्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या पुनरागमनाकडेच.
पाठदुखीच्या आजाराने चार महिने मैदानापासून दूर राहिलेला बुमराह भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याचा शिताफीने वापर होणे गरजेचे असेल. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या हस्तक्षेपानंतर बुमराहला गुजरातकडून रणजी सामना खेळण्यापासून सूट देण्यात आली. आंतरराष्टÑीय पुनरागमन करण्यात अडथळा येऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती.
२०१९ मध्ये भारताने एकदिवसीय सामन्यावर लक्ष केंद्रित केले, तर यंदा टी-२० वर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. आॅक्टोबरमध्ये पर्थ येथे द. आफ्रिकेविरुद्ध विश्वचषकाचा पहिला सामना खेळण्याआधी भारताला १५ टी-२० सामने खेळायचे आहेत. आयपीएल संपेपर्यंत कुणाचेही भारतीय संघात स्थान निश्चित नसेल. मात्र, कोच रवी शास्त्री आणि कर्णधार कोहली हे सर्व खेळाडूंची कामगिरी न्याहाळतील.
भारताचे मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला विश्रांती देण्यात आली. दीपक चहार आणि भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त आहेत. अशावेळी नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर हे बुमराहच्या सोबतीने कसा मारा करतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
फलंदाजीत शिवम दुबे, हार्दिक पांड्या यांच्या फलंदाजीवर लक्ष असेल. ऋषभ पंत कसा खेळतो हे देखील महत्त्वपूर्ण राहणार आहे. उपकर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यावर झकास सुरुवात करून देण्याची जबाबदारी राहील.
कर्णधार अँजेलो मॅथ्यूज, कुसल परेरा यांना धावा काढून भारताला कडवे आव्हान द्यावे लागेल. भारताने या मैदानावर एकमेव टी-२० सामना आॅस्ट्रेलियाविरुद्ध १० आॅक्टोबर २०१७ ला खेळला होता. त्यात भारत पराभूत झाला. त्यावेळी भारतीय संघाच्या बसवर दर्शकांनी दगडफेक केली होती.
>पोस्टर, बॅनर नेण्यास मनाई
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी-२० सामना आसामची राजधानी गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यासाठी स्टेडियममध्ये कोणताही अनपेक्षित प्रसंग टाळण्यासाठी पोस्टर, बॅनर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवजीत सायका यांनी ही माहिती दिली. चौकार-षट्कारासाठीचे फलक, मार्कर पेन मैदानात नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, या सर्व गोष्टींचा नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून होत असलेल्या निदर्शनाशी काहीही संबंध नसल्याचे गुवाहाटीचे पोलीस आयुक्त एम.पी. गुप्ता यांनी स्पष्ट केले.
>भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), धनुष्का गुणतिलक, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्व्हा, इसुरु उडाना, भानुका राजपक्षे, ओशदा फर्नांडो, वानिंदु हसरंगा, लाहिरु कुमारा, कुसल मेंडिस, लक्षण संदाकन आणि कसून राजिता.

Web Title: T-1 Series: Jasprit Bumrah eager to return