Join us

सरासरीपेक्षा टिकून राहणे महत्त्वाचे, चेतेश्वर पुजाराचे परखड स्पष्टीकरण

Cheteshwar Pujara News : अनेकवेळा चेंडूंचा सामना करणे हे धावा करण्यापेक्षा अधिक गरजेचे आहे, असे भारताचा अव्वल कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 07:43 IST

Open in App

नवी दिल्ली : अनेकवेळा चेंडूंचा सामना करणे हे धावा करण्यापेक्षा अधिक गरजेचे आहे, असे भारताचा अव्वल कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने म्हटले आहे. पुजारा याने नुकत्याच भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हेच केले. पुजारा याच्या मते, स्ट्राईक रेटच्या जास्त चर्चेत याला महत्त्व दिले जात नाही. त्याने दोन वर्ष आधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ४१.४१च्या सरासरीने ५२१धावा केल्या होत्या, तर या दौऱ्यात २९.२०च्या सरासरीने  २७१ धावा केल्या आहेत. हे दोन्ही समान महत्त्वपूर्ण आहे. पुजाराने इंग्लंड विरोधात आगामी मालिकेत बायोबबलमध्ये जाण्याच्या आधी वृत्तसंस्थेला सांगितले की,‘दोन्ही दौरे संघासाठी शानदार राहिले. त्यात मी चांगला खेळ केला. दोन्ही वेळा परिस्थिती पूर्ण वेगळी होती. मी जवळपास आठ महिन्यांनी पुनरागमन केले. या दरम्यान  एकही प्रथम श्रेणी क्रिकेट सामना झाला नाही.’ या मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाचा सामना केला. त्याने अनेक चेंडू शरीरावर सहन केले. पुजाराने सांगितले की,‘ तयारीनुसार हे सहज सोपे नव्हते आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आमच्यातील प्रत्येकाविरोधात रणनितीने उतरला होता. लय मिळवण्यासाठी थोडा वेळ लागला. मात्र, सुदैवाने नंतर सर्वकाही सकारात्मक राहिले.’ त्याने सांगितले की, ‘आकड्यांमध्ये ही मालिका फार चांगली दिसत नाही. खेळपट्टीनुसार अधिक धावा बनलेल्या नाहीत. मात्र, नि:संदेह गेल्यावेळपेक्षा आता आव्हाने खूप होती.’ भारताकडून ८१ कसोटी सामने खेळणाऱ्या पुजाराने सांगितले की, दोन वर्षे आधी त्याने १२५८ चेंडू खेळले होते, तर त्याने यावेळी ९२८ चेंडूंचा सामना केला. यंदा हे जास्त आव्हानात्मक होते. जलदगती गोलंदाजी आक्रमण, खेळपट्टी आणि भारतीय संघातील अधिक खेळाडू दुखापतग्रस्त होत असल्याने यंदाचे महत्त्व जास्त आहे. 

  पुजाराने सांगितले की, ‘दोन्ही दौऱ्यांची तुलना करणे खूप कठीण आहे. मात्र, हा दौरा विशेष होता. आमचा संघ कमजोर होता. अनेक युवा खेळाडू खेळत होते. ऑस्ट्रेलियाचा संघ मागच्या २०१७ - १८च्या मालिकेतही तगडाच होता. पुजाराचा स्ट्राईकरेट हा नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. त्याने सांगितले. अनेक वेळा स्ट्राईक रेट हा गरजेचा नसतो. प्रत्येक फलंदाजाची भूमिका ही वेगळी असते. संघ व्यवस्थापन त्याला चांगल्या पद्धतीने समजतो.’  पुजाराने सांगितले की, त्याला प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, अजिक्य रहाणे यांनी यासाठी प्रोत्साहित केले. मला धावा करण्यास अतिरिक्त  वेळ लागतो. मला माहीत आहे की, मी एका बाजूने  टिकून राहिलो तर इतर फलंदाजांचे काम सोपे होते. दुसऱ्या बाजूने रोहित आणि ऋषभ यांच्यासारखे स्ट्रोक प्लेअर असतील, तर मला अशाच पद्धतीने फलंदाजी करण्याची गरज असते.’

टॅग्स :चेतेश्वर पुजाराभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया