Join us

"४४५ रन्स अर्ध्या तासात बनत नाहीत, केवळ घाण शॉट्स..."; विराट कोहलीवर संतापले सुनील गावसकर

Sunil Gavaskar on Virat Kohli, IND vs AUS 3rd Test: विराट अवघ्या ३ धावांवर ऑफ स्टंप बाहेरील चेंडूवर झेलबाद झाला. तसेच भारताने ५१ धावांत वरच्या फळीतील ४ बळी गमावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 14:52 IST

Open in App

Sunil Gavaskar on Virat Kohli Dismissal, IND vs AUS 3rd Test: गाबाच्या मैदानात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ५१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी गमावले. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ट्रेव्हिस हेड (१५२), स्टीव्ह स्मिथ (१०१) यांची शतके आणि अलेक्स कॅरीच्या (७०) अर्धशतकाच्या बळावर ४४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या वरच्या फळीतील चार फलंदाजांनी पुन्हा चाहत्यांची घोर निराशा केली. संघाने पन्नाशी गाठण्याआधीच यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली आणि रिषभ पंत तंबूत परतले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत केएल राहुलने एक बाजू सांभाळत नाबाद ३३ धावा केल्या. पण भारताचे माजी कर्णधार लिटल मास्टर सुनील गावसकर भारतीय फलंदाजांवर चांगलेच संतापले.

काय म्हणाले सुनील गावसकर?

"यशस्वी जैस्वाल कसा बाद झाला ते तुम्ही पाहा. जेव्हा तुमच्या पुढ्यात इतके मोठे आव्हान असते त्यावेळी तुम्हाला मैदानावर जाऊन थोडे संयमाने खेळणे आवश्यक असते. हवेत शॉट खेळायचा नाही हे आपल्या मनाला कायम सांगावे लागते. ४४५ धावा अर्ध्या तासात होत नाहीत किंवा फॉलो-ऑन टाळायला आवश्यक असणाऱ्या २४५ धावाही अर्ध्या तासात करता येत नाहीत. शुबमन गिल आणि विराट कोहली दोघांनीही ऑफसाईडच्या बाहेरचे चेंडू मारले आणि झेल देऊन बाद झाले. हे फटके अनावश्यक होते. त्यांच्या बाद होण्याचं खेळपट्टीशी काहीही कनेक्शन नाही. ते लोक घाण शॉट्स खेळून बाद झालेत," अशा रोखठोक शब्दांत सुनील गावसकरांनी टीका केली.

  • शुबमन गिल बाद झाला तो क्षण-

विराट कोहलीच्या बाद होण्याबाबत बोलताना गावसकर म्हणाले, "तो चेंडू जर चौथ्या स्टंपवर असता तर मी समजू शकलो असतो. पण तो चेंडू वाईड होता, सातव्या-आठव्या स्टंपवर होता. त्या चेंडूला बॅट लावण्याची काहीच गरज नव्हती. बाद झाल्यानंतर विराट नक्कीच नाराज झाला असणार. विराट कोहली बाद झाल्यावर रिषभ पंत मैदानात येण्याआधी पावसाला थोडी सुरुवात झाली होती. जर विराटने थोडासा संयम दाखवला असता तर आज दिवसाचा खेळ संपताना विराट आणि केएल राहुल दोघेही नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतले असते."

  • विराट कोहली बाद झाला तो क्षण-

तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची सामन्यावर पकड

४४५ धावांच्या मोठ्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल सलामीला आले. यशस्वी जैस्वाल दुसऱ्याच चेंडूवर ४ धावा काढून बाद झाला. शुबमन गिल १ धाव काढून तंबूत परतला. विराट कोहलीही ३ धावांत माघारी परतला. पाठोपाठ रिषभ पंत ९ धावांवर बाद झाला. केएल राहुलने एका बाजू लावून धरली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा (नाबाद ०) सोबत केएल राहुल (नाबाद ३३) पॅव्हेलियनमध्ये परतला. भारत सध्या ४ बाद ५१ धावसंख्येवर असून ३९४ धावांनी पिछाडीवर आहे.

  • अवघ्या दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल बाद झाला तो क्षण-

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. नॅथन मॅकस्वीनी (९) आणि उस्मान ख्वाजा (२१), मार्नस लाबूशेन (१२) तिघे स्वस्तात बाद झाले. ३ बाद ७५ या धावसंख्येनंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड यांची जोडी जमली. या दोघांनी तब्बल २४१ धावांची भागीदारी केली. स्मिथ १०१ धावांवर बाद झाला. ट्रेव्हिस हेडने फटकेबाजी सुरुच ठेवत १५२ धावा केल्या. त्यानंतर अलेक्स कॅरी यानेही ७० धावांची खेळी केली. या तीन बड्या खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ११७ षटके खेळली आणि ४४५ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने ७६ धावा देऊन ६ बळी घेतले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीयशस्वी जैस्वालशुभमन गिलसुनील गावसकर