नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काही नावं सुवर्ण अक्षरात लिहिली जातात तर काही नावे विस्मरणात जातात. परंतु जेव्हाही २००७ चा पहिला टी-२० वर्ल्डकपची चर्चा होते तेव्हा प्रत्येक भारतीयांच्या मनात एक नाव कायम पुढे येते ते म्हणजे जोगिंदर शर्मा...ही ती व्यक्ती आहे जिनं संपूर्ण देशाला जल्लोष करण्याची संधी दिली होती. त्याने इतिहासाची दिशा बदलली पण तो स्वतःच विस्मृतीत गडप झाला.
तारीख होती २४ सप्टेंबर २००७, ठिकाण होते जोहान्सबर्गमधील वॉन्डरर्स स्टेडियम आणि भारतासमोर होता कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान. फायनल सामन्याचा शेवटचा टप्पा आला होता. पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या ६ चेंडूंमध्ये १३ धावांची गरज होती आणि धोकादायक मिसबाह-उल-हक क्रीजवर होता. कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे अनुभवी खेळाडू हरभजन सिंगचा पर्याय होता परंतु त्याने एक मोठी रिस्क घेत हरियाणाच्या मध्यमगती गोलंदाज जोगिंदर शर्माकडे चेंडू सोपवला. स्टेडियममध्ये शांतता पसरली होती, लाखो भारतीयांनी श्वास रोखून धरला होता. जोगिंदर शर्माचा पहिला चेंडू वाईड होता. पुढच्या चेंडूवर एकही धाव झाली नाही पण दुसऱ्या चेंडूवर मिस्बाहने सिक्स मारला. आता सामना ४ चेंडू आणि ६ धावांचा झाला होता. सामना भारताच्या हातून निसटला असे वाटत होते पण मग जोगिंदरने पुढचा चेंडू टाकला. मिस्बाहने स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू हवेत उडाला. श्रीशांतने झेल घेतला आणि भारत विश्वविजेता बनला. या सामन्यानंतर जोगिंदर शर्मा रातोरात नॅशनल हिरो बनला.
क्रिकेटविश्वातून अचानक झाला गायब
बऱ्याचदा वर्ल्डकप खेळणारे खेळाडू पुढे टीम इंडियाचा बराच काळ हिस्सा राहतात. परंतु जोगिंदर शर्मासोबत उलटे घडले. २००७ च्या त्या अंतिम सामन्यानंतर जोगिंदर भारतासाठी पुन्हा कधीही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. तो एका सामन्यापुरता चमकलेला खेळाडू बनून राहिला. दुखापती आणि संघातील वाढत्या स्पर्धेमुळे तो हळूहळू टीम इंडियाच्या नजरेतून दूर गेला. थोड्या काळासाठी त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये CSK कडून खेळला पण निळ्या जर्सीमध्ये त्याचे पुनरागमन कधीच झाले नाही.
जोगिंदर आता काय करतोय?
२००७ मधील त्या ऐतिहासिक विजयानंतर हरियाणा सरकारने क्रीडा कोट्याअंतर्गत जोगिंदरची हरियाणा पोलिसात उपअधीक्षक (DSP) म्हणून नियुक्ती केली. एका खेळाडूसाठी आपली ओळख बदलणे सोपे नसते पण जोगिंदरने ही जबाबदारी मोठ्या कौशल्याने सांभाळली. आज तो हरियाणा पोलिसात एसीपी पदावर कार्यरत आहे. क्रिकेटच्या झगमगाटापासून दूर त्याचे जग आता पोलीस स्टेशन, फाईली आणि कायदा व सुव्यवस्थेपुरते मर्यादित झाले आहे. २०२० साली कोरोना महामारीत त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होती. रस्त्यावर ड्युटी करताना तो दिसत होता. आज क्रिकेट जगतातील हा खेळाडू पोलीस सेवेत कार्यरत राहून देशसेवा करत आहे.