मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने दुसऱ्या कसोटीत भारताविरुद्ध आॅस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवल्यानंतर आॅप्टस स्टेडियमच्या खेळपट्टीला आयसीसीने ‘साधारण’ मानांकन दिल्याने निराशा व्यक्त केली.
पर्थमध्ये खेळताना काही फलंदाजांना चेंडू लागला होता, विशेषत: दुसºया डावात. स्टार्कच्या मते खेळपट्टी चांगली होती आणि अशा प्रकारच्या मानांकनामुळे हा पूर्णपणे फलंदाजांचा खेळ होण्याचा धोका आहे. बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी बोलताना स्टार्क म्हणाला, ‘पर्थच्या खेळपट्टीला साधारण मानांकन मिळणे निराशाजनक बाब आहे. माझ्या मते येथे चेंडू व बॅटदरम्यान चांगली लढत होती. क्रिकेटमध्ये आपण अशी लढत बघण्यास नक्कीच उत्सुक असतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, गेल्या वषी एमसीजीमध्ये खेळणे रटाळ होते. खेळपट्टीकडून काही मदत नव्हती. चेंडू व बॅटमध्ये लढत झाली तरच कसोटी क्रिकेट जिवंत राहील आणि पर्थप्रमाणे चाहत्यांना मैदानात गर्दी करण्यास भाग पाडेल. माझ्या मते ही खेळपट्टी शानदार होती.’ स्टार्क पुढे म्हणाला, ‘खेळपट्टीवरील भेगांनी आपली भूमिका बजावली. चौथ्या व पाचव्या दिवशी खेळपट्टी भंगते त्यावेळी असे घडते. जर नेहमी पाटा खेळपट्टी तयार केली तर क्रिकेट केवळ फलंदाजांचा खेळ होईल.’ (वृत्तसंस्था)