नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने एअर स्ट्राइक केला. भारताने जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर जोरदार हवाई हल्ला केला. यात जैशचे मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. भारताच्या धाडसी सैन्याचे क्रीडाविश्वाने तोंडभरून कौतुक केले.
एकात्मतेत निर्भयता आहे आणि अमर्याद शक्ती आहे. भारताची जनता हीच भारतमातेची ढाल आहे. या जगात दहशतवादाला थारा नाही. आपण एक संघ आहोत. जय हिंद! - सचिन तेंडुलकर, भारतरत्न
कोणी दगडफेक केली, तर त्याच्यावर फूल फेका. पण लक्षात ठेवा की फुलासह कुंडीही फेकून मारली पाहिजे. जय हिंद! ऑपरेशन सिंदूर हे अतिशय चपखल नाव आहे. - वीरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटू
भारतीय सशस्त्र दलांनी प्रतिकूल परिस्थितीचे रूपांतर एका शक्तिशाली विजयात केले. भारतीय सैन्याच्या शौर्य आणि धाडसाने सर्वांना अभिमान वाटतो. - मोहम्मद शमी, क्रिकेटपटू
आमचे सैनिक धमकी देत नाहीत, ते कारवाई करतात. ऑपरेशन सिंदूर हे केवळ शौर्याची भाषा बोलणाऱ्या वीरांची साक्ष आहे.निकहत झरीन, माजी विश्वविजेती बॉक्सर
माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, हरभजन सिंग, शिखर धवन, आकाश चोप्रा, कुस्तीगीर योगेश्वर दत्त, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनीही भारतीय सैन्याला सलाम केला. तसेच, ऑलिम्पिक पदक विजेता आणि व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंगने ‘भारत माता की जय’ म्हटले.
पहलगाम येथील भयानक हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून योग्य उत्तर दिले याचा मला आनंद आहे. दहशतवादाला उत्तर दिलेच पाहिजे. ऑपरेशनला किती सुंदर नाव आहे. भारत माता की जय.विदित गुजराती, बुद्धिबळपटू