टी-२० विश्वचषक २०२६ च्या रणधुमाळीत भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, भारताच्या या यशाचे श्रेय दक्षिण आफ्रिकेच्या एका निर्णयाला जात असून, त्यावरून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने दक्षिण आफ्रिकेवर सडकून टीका केली आहे. वॉनने दक्षिण आफ्रिकेला या स्पर्धेतील "सर्वात मूर्ख संघ" असे संबोधले आहे.
सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केला. या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला. भारताचा नेट रनरेट वेस्ट इंडिजपेक्षा कमी होता, त्यामुळे जर आफ्रिका वेस्ट इंडिजकडून हरली असती, तर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला असता. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला नमवून भारताला जीवदान दिले, हेच वॉनला खटकले आहे.
मायकल वॉन काय म्हणाला?
एका पॉडकास्टमध्ये बोलताना वॉन म्हणाला, "या स्पर्धेतील सर्वात मूर्ख संघ कोणता असेल तर तो दक्षिण आफ्रिका आहे. जर त्यांनी वेस्ट इंडिजला जिंकू दिले असते, तर टीम इंडिया स्पर्धेबाहेर फेकली गेली असती. जर तुम्हाला विश्वचषक जिंकायचा असेल, तर सर्वात आधी सर्वात बलाढ्य संघाला (भारत) स्पर्धेतून बाहेर करणे आवश्यक असते. आफ्रिकेने भारताला संधी दिली आणि ते 'वादळ' थांबवणे कठीण गेले."
दक्षिण आफ्रिकेने केवळ भारताला मदत केली नाही, तर पुढच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध आपल्या तीन मुख्य खेळाडूंना विश्रांती देखील दिली, यावरही वॉनने आश्चर्य व्यक्त केले आहे. भारताने उपांत्यफेरीत इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये धडक मारली होती. इंग्लंडला भारताने सेमीतच बाहेरचा रस्ता दाखविल्याने वॉनला मिरच्या झोंबल्या आहेत. त्याच्या मतानुसार दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजबरोबर मुद्दामहून हरायला हवे होते. मायकल वॉनने असे बोलून सर्व मर्यादा पार केल्या आहेत.