मुंबईत धक्कादायक घटना; क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागून खेळाडूचा मृत्यू

दुसऱ्या सामन्यातील फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षण करत असलेल्या जयेश सावला यांच्या कानामागे येऊन धडकला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 10:51 IST2024-01-10T10:48:53+5:302024-01-10T10:51:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Shocking incident in Mumbai A player dies after being hit by a ball during a cricket match | मुंबईत धक्कादायक घटना; क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागून खेळाडूचा मृत्यू

मुंबईत धक्कादायक घटना; क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागून खेळाडूचा मृत्यू

Mumbai Cricketer Death ( Marathi News ) :मुंबईतील माटुंगा परिसरात असलेल्या दडकर मैदानात सोमवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान डोक्यात चेंडू लागल्याने ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जयेश सावला असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. दडकर मैदानात एकाचवेळी खेळवण्यात येत असलेल्या दोन क्रिकेट सामन्यांवेळी ही दुर्घटना घडल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, माटुंग्यातील दडकर मैदानात सोमवारी ५० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींसाठीच्या कच्छी विसा ओसवाल विकास लिजेंड कप या टी-ट्वेंटी मालिकेतील दोन क्रिकेट सामने खेळवण्यात येत होते. यादरम्यान शेजारीच सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यातील फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षण करत असलेल्या जयेश सावला यांच्या कानामागे येऊन धडकला.

चेंडूचा जबर मार लागल्याने जयेश सावला हे जागीच कोसळले. त्यानंतर सावला यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथील डॉक्टरांनी जयेश सावला यांनी मृत घोषित केलं.

मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात एकाच मैदानात दोन किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळवणे जाणे ही नित्याचीच बाब असते. त्यामुळे चेंडू लागून खेळाडू जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. मात्र माटुंग्यातील दडकर मैदानात सोमवारी थेट एका खेळाडूला आपले प्राण गमवावे लागल्याने क्रिकेटप्रेमींवर शोककळा पसरली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे.

Web Title: Shocking incident in Mumbai A player dies after being hit by a ball during a cricket match