IND vs WI 3rd ODI : भारताने तिसरा वन डे सामना जिंकून मालिकेत वेस्ट इंडिजचा २-१ असा पराभव केला. तिसऱ्या वन डे सामन्यात संजू सॅमसनने ५१ धावांची खेळी केली. त्याने ४१ चेंडूंत २ षटकार व ४ चौकारांसह ५१ धावा केल्या. सॅमसन टीम इंडियात सतत आत-बाहेर होत असतो. अशा स्थितीत तिसऱ्या वन डे सामन्यात फलंदाजीनंतर सॅमसनने संघातील आपल्या स्थानाविषयी स्पष्ट मत मांडले.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर भडकला हार्दिक पांड्या; म्हणाला, बेसिक सुविधा तरी व्यवस्थित द्या
सॅमसन म्हणाला, "भारतीय क्रिकेटपटू असणे हे एक आव्हान आहे. मी गेल्या ८ ते ९ वर्षांपासून भारतासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. राष्ट्रीय संघासोबत खेळत आहे. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याची थोडीशी समज मिळते. तुम्हाला किती षटकं मिळतील यावर अवलंबून आहे, फलंदाजीच्या स्थितीबद्दल नाही. त्यामुळे तुम्हाला त्यानुसार तुमची फलंदाजी तयार करावी लागेल.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये सॅमसन काही खास करू शकला नाही. त्याला १९ चेंडूत केवळ ९ धावा करता आल्या. त्याच्या फलंदाजीबद्दल सॅमसन म्हणाला, “खेळपट्टीच्या मध्यभागी काही वेळ घालवणे, काही धावा करणे आणि माझ्या देशासाठी योगदान देणे खरोखरच खूप छान वाटते. माझ्या वेगवेगळ्या गोलंदाजांसाठी वेगवेगळ्या योजना होत्या, मला माझे फुटवर्क वापरायचे होते आणि वर्चस्व गाजवायचे होते. "
भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. शुबमन गिल ( ८५), इशान किशन ( ७७), हार्दिक पांड्या ( ७०*) व 
संजू सॅमसन ( ५१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ५ बाद ३५१ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मुकेश कुमारने पहिल्याच स्पेलमध्ये विंडीजचे ३ फलंदाज १७ धावांवर तंबूत पाठवले. शार्दूल ठाकूरने ४ व कुलदीप यादवने २ धक्के दिले आणि भारताचा दणदणीत विजय पक्का केला. वेस्ट इंडिजचा संघ १५१ धावांत तंबूत परतला.  विंडीजविरुद्धचा हा सलग १३ वा वन डे मालिका विजय ठरला. २००७ पासून भारतीय संघ अपराजित आहे.