ICC T20 World Cup Final, India vs New Zealand : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशनच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विक्रमी २५६ धावांचे टार्गेट सेट केले आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये एखाद्या संघाने एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांची स्फोटक फलंदाजी
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीनं टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४३ चेंडूत ९८ धावांची भागीदारी रचली. अभिषेक शर्मा २१ चेंडूत ५२ धावांची खेळी करून परतल्यावर ईशान किशनचा धमाका पाहायला मिळाला. संजूच्या साथीनं त्याने दुसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत १०५ धावांची भागीदारी रचली. संजू सॅमसन याने ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने ८९ धावांची खेळी साकारली. याशिवाय ईशान किशन याने २५ चेंडूत ५४ धावांचे योगदान दिले. त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि ४ षटकार पाहायला मिळाले. टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेक शर्माची कमाल; फायनलमध्ये विक्रमी अर्धशतकासह लुटली मैफील
अखेरच्या षटकात शिवम दुबेचा धमाका
भारतीय संघाने १५ व्या षटकातच धावफलकावर २०३ धावा लावल्या होत्या. पण एकाच षटकात संजू सॅमसन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांची विकेट पडल्यावर भारतीय संघ २५० धावांपर्यंत मजल मारणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. पण अखेरच्या षटकात शिवम दुबेचा पॉवर हिटिंग शो पाहायला मिळाला. त्याने ८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २६ धावांचे योगदान देत भारतीय संघाच्या धावफलकावर निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २५५ धावा करत न्यूझीलंडसमोर विक्रमी धावसंख्या उभारली. भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कमध्ये तिसऱ्यांदा २५० धावा करण्याचा खास रेकॉर्डही आपल्या नावे केला.
धावांसह विक्रमांची 'बरसात'
- भारतीय संघाने तिसऱ्यांदा २५० धावा करताना टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील ५ बाद २५५ ही तिसरी सर्वोच्च धावंसख्या उभारली
- आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाने सातव्यांदा २५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला.
- अभिषेक शर्मानं १८ चेंडूतील अर्धशतकासह नॉकआउटमधील सर्वात जलद शतक झळकावले.
- भारतीय संघाने पॉवर प्लेमध्ये ९२ धावा केल्या. ही टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पॉवर प्लेमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
- भारतीय संघाने ४४ चेंडूत धावफलकावर १०० धावा लावल्या. नॉकआउटमधील कोणत्याही संघाची ही जलद सेंच्युरी ठरली.
- त्याआधी भारतीय संघाने २४ चेंडूत सर्वात जलद अर्धशतकाचा रेकॉर्डही आपल्या नावे केला.