कोलंबो: टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यापूर्वी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर एक दृश्य पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेटचा 'हिटमॅन' रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा दिग्गज माजी गोलंदाज वसीम अक्रम हे एकमेकांना प्रेमाने मिठी मारताना, हस्तांदोलन करताना दिसले. या दोन दिग्गजांमधील जिव्हाळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
रोहित शर्मा याला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा 'ब्रँड अॅम्बेसेडर' म्हणून खास आमंत्रित करण्यात आले होते. सामन्याच्या सुरुवातीला जेव्हा रोहित आणि वसीम अक्रम वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन मैदानात आले, तेव्हा रोहितने पुढे होऊन अक्रम यांची गळाभेट घेतली. दोघांनी काही वेळ दिलखुलास गप्पा मारल्या आणि फोटोही काढले. रोहितने केवळ अक्रमचीच भेट घेतली नाही, तर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंना या मोठ्या सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
रोहित आणि वसीम अक्रम यांचा हा व्हिडिओ समोर आल्यावर सोशल मीडिया दोन गटात विभागला गेला आहे. काही चाहत्यांनी "खेळ ही शेवटी खेळ भावना आहे," असे म्हणत रोहितच्या या कृत्याचे कौतुक केले. मात्र, भारत-पाक कट्टर वादाच्या पार्श्वभूमीवर काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "मैदानावर इतका जिव्हाळा दाखवण्याची गरज नव्हती," अशा कमेंट्सही नेटीझन्सनी केल्या आहेत. तरीही, रोहित आयसीसीचा अधिकृत प्रतिनिधी असल्याने त्याला या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या, असेही सांगितले जात आहे.
मैदानावर मात्र टीम इंडियाचाच डंका
मैदानाबाहेर कितीही मैत्री दिसली असली, तरी पिचवर भारतीय संघाने पाकिस्तानला अजिबात थारा दिला नाही. ईशान किशनच्या वादळी ७७ धावा आणि जसप्रीत बुमराह-हार्दिक पांड्या यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना ६१ धावांनी सहज जिंकला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ ११४ धावांवर गारद झाला.