Rishabh Pant Nominated Laureus Award : भारतीय संघातील स्टार विकेट किपर बॅटर रिषभ पंत सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दुबईत असलेल्या भारतीय संघाच्या ताफ्यासोबत आहे. मिनी वर्ल्ड कप नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात रिषभ पंत बाकावरच बसल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या ऐवजी टीम मॅनेजमेंट लोकेश राहुलला पहिली पसंती देताना दिसून येत आहे. उर्वरित सामन्यात तरी त्याचा विचार होणार का? असा प्रश्न पंतच्या चाहत्यांना पडलाय. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी आधी बाकावर बसून असलेल्या पंतसाठी आनंदाची बातमी समोर येतीये. आश्चर्यकारक कमबॅकसाठी अर्थात अपघातानंतर धमाक्यात पदार्पण करण्यासाठी त्याला प्रतिष्ठित पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वर्ल्ड कमबॅक ऑफ इयर गटातून प्रतिष्ठित पुरस्काराच्या शर्यतीत आलाय पंत
रिषभ पंत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कधी कमबॅक करणार ते अजून गुलदस्त्याच आहे. पण अपघातातून सावरून दिमाखात टीम इंडियात कमबॅक केल्याबद्दल या स्टार विकेट किपर बॅटरला प्रतिष्ठित लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्ससाठी नामांकित करण्यात आले आहे. वर्ल्ड कमबॅक ऑफ द इयर या गटातून त्याला नामांकन मिळाले आहे. सचिन तेंडुलकरनंतर या प्रतिष्ठित पुरस्काराचे नामांकन मिळवणारा तो दुसरा क्रिकेटर ठरलाय.
पंतसोबत पुरस्काराच्या शर्यतीत असणारे अन्य चेहरे
पंतसोबत या पुरस्काराच्या नामांकित खेळाडूंच्या यादीत ब्राझीलची जिमनॅस्टिक रेबेका अंद्रादे (Rebeca Andrade) हिचाही समावेश आहे. या खेळाडूनं क्रूसिएट लिगामेंटच्या दुखापतीतून सावरत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली होती. या दोघांशिवाय स्की रेसर लारा गुट-बेहरामी, कॅलेब ड्रेसेल, मार्क मार्केज आणि ऑस्ट्रेलियन स्विमर टिटमुश यांचाही वर्ल्ड कमबॅक ऑफ इयर गटातून नामांकित करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. २१ मार्चला पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.
मोठ्या अपघातातून सावरत दमदार कमबॅक करून दाखवलं
डिसेंबर २०२२ मध्ये रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर पंत जवळपास ६२९ दिवस क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. २०२४ च्या आयपीएल हंगामात पंतने दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून क्रिकेटच्या मैदानात कमबॅक केले. त्यानंतर २०२४ च्या वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याने आपली छाप सोडली. या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत त्याने ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.