बेंगळुरु
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाच्या आयपीएल करंडक विजयी सेलिब्रेशनसाठी एम.चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर तुफान गर्दी झाली आहे. या गर्दीत चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर ३३ जण जखमी झाले आहेत. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता संघाच्या खेळाडूंची बस थेट हॉटेलवर रवाना करण्यात आली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामागे आयोजकांचा निष्काळजीपणा आणि गर्दी नियंत्रणातील त्रुटी असल्याचा संशय आहे. पोलीस प्रशासन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.
आरसीबीच्या विजयाच्या निमित्ताने चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळाडूंच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपल्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर तोबा गर्दी झाली होती. यावेळी अनावर झालेली गर्दी सुरक्षारक्षकांच्या हाताबाहेर गेली. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन अनेक जण जखमी झाले आणि आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार तीन जणांना आपला जीव गमावावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखालील आरसीबी संघाची विजयी मिरवणूक काढण्याचा इरादा प्रशासनाचा होता. परंतु, संभाव्य गर्दी लक्षात घेता परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर विजयी परेड न काढता चिन्नास्वामी स्टेडियमवर सत्कार सोहळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी चाहत्यांना मोफत प्रवेश दिला जाणार असल्याचं जाहीर केलं गेलं होतं. विजयी परेड नसल्यानं सर्व चाहत्यांनी थेट स्टेडियमबाहेर गर्दी केली. चिन्नास्वामी स्टेडियमची आसन क्षमता ३० ते ३२ हजार इतकी आहे. पण स्टेडियमबाहेर लाखोंची गर्दी झाली. यावेळी गर्दीला आवरणं सुरक्षारक्षकांनाही कठीण होऊन बसलं. गर्दी इतकी होती चक्क स्टेडियमबाहेरील वाहनांवर लोक चढले. वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे.
आयपीएल २०२५ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मंगळवारी एका रोमांचक सामन्यात पंजाब किंग्ज इलेव्हनचा पराभव केला आणि १८ वर्षांनंतर त्यांचा पहिला विजय नोंदवला. या विजयानंतर बेंगळुरूमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. विजयानंतर संघाचा सन्मान करण्यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी चिन्नास्वामी स्टेडियमजवळ एक कार्यक्रम आयोजित केला होता. या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येने लोक जमले होते. गर्दी इतकी मोठी होती की, काही लोक धडकेत जखमी झाले आणि काही बेशुद्धही पडले.
३० मिनिटांत स्टेडियम रिकामे करण्याचे निर्देशबेंगळुरू पोलिसांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला स्टेडियममध्ये सुरू असलेला विजयी समारंभ ३० मिनिटांत संपवण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी आधीच काही सूचना जारी केल्या होत्या. लोकांना मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला होता. असे असूनही, स्टेडियमभोवती मोठी गर्दी जमली, ज्यामुळे ही घटना घडली आहे. बेंगळुरू पोलिस आणि प्रशासनाने जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली आहे.