पावसामुळे बराच वेळ वाया गेल्याने ११-११ षटकांच्या सामन्यात राजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्स संघासमोर वरचढ ठरला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना १५० धावा केल्या. मुंबई इंडियन्सला मात्र १२३ धावांपर्यंत मजल मारता आली. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने जबरदस्त खेळी केली. तर वैभव सूर्यवंशीनेही फटकेबाजी करत त्याला साथ दिली.
गुवाहाटीतील बरसापारा मैदानावर झालेला हा सामना पावसामुळे उशिरा सुरू झाला. बराच खेळ वाया गेल्याने ११ षटकांचा सामना खेळवण्यात आला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांचा हा निर्णय राजस्थानच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवला.
यशस्वी-वैभवची फटकेबाजी
सलामीला आलेल्या राजस्थानच्या यशस्वी जयसवाल आणि वैभव सूर्यवंशीने मुंबईच्या अनुभवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पहिल्या तीन षटकातच राजस्थानने ५८ धावा केल्या.
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वीने मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. वैभव आणि बुमराह पहिल्यांदाच आमने-सामने आले. पहिल्या तीन चेंडूचा सामना करताना वैभवने बुमराहला दोन षटकार लगावले.
वैभवने १४ चेंडूमध्येच ३९ धावा केल्या. तर यशस्वी ३२ चेंडूमध्ये ७७ धावांवर नाबाद राहिला. राजस्थानचा कर्णधार रियान परागनेही १० चेंडूत २० धावा केल्या.
मुंबई इंडियन्सची खराब सुरूवात
१५१ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात रयान रिकल्टन संघाची धावसंख्या १० असताना बाद झाला. त्यानंतर २० धावांवर मुंबईला दुसरा झटका बसला. सूर्यकुमार यादव दोन चेंडूमध्ये ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्माही ५ धावांवर बाद झाला. मुंबईचे फलंदाज सलग बाद होत गेले.
शेफर्ड रुदरफर्ड आणि नमन धीर या दोघांनीच डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण रुदरफर्ड ८ चेंडूमध्ये २५ धावा आणि नमन १३ चेंडूत २५ धावा करून बाद झाले. त्यानंतर मुंबईचा डाव गडगडला आणि संपूर्ण संघ १२३ धावांवर बाद झाला.