Join us  

PM मोदींच्या भेटीमुळे आत्मविश्वास वाढला, खचलेल्या मनाला धीर मिळाला - मोहम्मद शमी

icc odi world cup 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 5:11 PM

Open in App

ind vs aus final match | अमरोहा : वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात यजमान भारतीय संघाचा पराभव झाला अन् तमाम भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. स्पर्धेतील सर्व सामने जिंकून टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण, एक पराभव भारतीयांच्या स्वप्नावर पाणी टाकण्यासाठी पुरेसा ठरला. पराभवानंतर चाहत्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपल्या संघाला धीर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जाऊन आपल्या शिलेदारांची भेट घेऊन त्यांच्या खेळीला दाद दिली.

सामन्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच मोदींनी भारतीय शिलेदारांच्या मेहनतीचे कौतुक केले. यंदाच्या पर्वात सर्वाधिक (२४) बळी घेणारा मोहम्मद शमी भारतासाठी हुकुमी एक्का ठरला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये मोहम्मद शमीची भेट घेऊन त्याच्या खेळीला दाद दिली. मोदींच्या भेटीनंतर मोहम्मद शमीने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे माध्यमांशी बोलताना शमीने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची भेट घेऊन धीर दिला, हे खूप महत्त्वाचे आहे. त्यावेळी आम्ही सामना गमावला होता. अशा परिस्थितीत जेव्हा पंतप्रधान तुम्हाला प्रोत्साहन देतात, तो एक वेगळा क्षण असतो. जेव्हा तुमचे मनोबल खचते तेव्हा तुमचे पंतप्रधान तुमच्यासोबत असतील तर आत्मविश्वास वाढतो आणि खूप धीर मिळतो.

एक पराभव अन् स्वप्न भंगलं...अंतिम सामन्यात नाणेफेकिचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले.  विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपमोहम्मद शामीनरेंद्र मोदीभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया