भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतून बांगलादेशचा संघ बाहेर पडला आहे. भारतात येऊन हा संघ या स्पर्धेतील सामने खेळण्यास तयार नव्हता. ICC कडे त्यांनी सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली. पण आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं खेळायच तर भारतात या नाहीतर बाहेर पडा, अशी भूमिका घेतली. हा मुद्दा गाजत असताना आता पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी मोठं वक्तव्य केले आहे. बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडचा संघ वर्ल्ड कप खेळणार असल्याची चर्चा रंगत असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्षांनी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडण्यासंदर्भात भाष्य केले आहे. नेमकं काय म्हणाले आहेत PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानची नवी नौटंकी
बांगलादेश स्पर्धेबाहेर पडल्यानंतर पाकिस्तानकडून नवा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. 24 जानेवारीला पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, जर पाकिस्तान सरकारनं वर्ल्ड कप खेळू नका, असा निर्णय घेतला, तर आयसीसी यंदाच्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कपसाठी नवा संघ शोधू शकते. हा निर्णय पाकिस्तान सरकारनं घ्यायचा आहे. पंतप्रधान परदेशातून परतल्यानंतरच पाकिस्तान संघ वर्ल्ड कप खेळणार की नाही, हे स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले आहेत.
T20 World Cup 2026: बांगलादेश टी-२० विश्वचषकात सहभागी न झाल्यास भारताचे किती नुकसान होईल?
नेमकं काय म्हणाले मोहसिन नक्वी?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बांगलादेशसंदर्भात घेतलेला निर्णय हा अन्यायकारक आहे. आयसीसी बोर्डाच्या बैठकीत आम्ही हेच सांगितलं आहे. एका देशासाठी हवं तेव्हा निर्णय घेता आणि दुसऱ्या देशासाठी पूर्णपणे उलट निर्णय घेता, असं होऊ शकत नाही. ही ICC ची दुटप्पी भूमिका आहे. बांगलादेशने कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकात खेळायलाच हवं. ते एक मोठे भागधारक आहेत आणि त्यांच्यावर असा अन्याय होऊ नये. जर पाकिस्तान सरकारनं सांगितलं की, त्यांना हा विश्वचषक खेळायचा नाही, तर आयसीसी २२ वा संघ सहभागी करू शकते. आम्ही आयसीसीपेक्षा पाकिस्तान सरकारला अधिक बांधील आहोत, त्यामुळे सरकार जे सांगेल तेच आम्ही करू." असे मोठ वक्तव्य PBC अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी केले आहे.