Pakistan Loss, IND vs PAK Champions Trophy 2025: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. आधी गोलंदाजी आणि मग फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात भारतीय संघ पाकिस्तानवर वरचढ ठरला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा केल्या. पाकिस्तानकडून केवळ सौद शकीलला अर्धशतक करता आले. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजीतही फारशी धार दिसली नाही. त्यांना भारताच्या केवळ चारच विकेट्स घेता आल्या. तसेच फिल्डिंगमध्येही पाकिस्तानने अनेक झेल सोडले. या साऱ्या गोंधळानंतर आता पाकिस्तानच्या संघनिवडीवर टीका केली जात आहे. त्यातच पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक याने शेलक्या शब्दांत टीका केली आहे.
"चॅम्पियन्स ट्रॉफीत सध्या खेळणाऱ्या आठ पैकी सात संघांकडे किमान एकतरी फुल टाइम स्पिन गोलंदाज आहे. पाकिस्तानने मात्र १५ जणांच्यात केवळ स्पिनर निवडला. स्पिनला पोषक उपखंडातील खेळपट्ट्यांवर तुम्ही बॅक अप स्पिनर खेळवत नसाल तर ही मोठी चूक आहे. दुसरं म्हणजे तुम्ही बाबरला सलामीला पाठवलंत आणि गेल्या तीन वर्षात एकदाही सलामी न केलेल्या फखर झमानलाही ओपनिंगला धाडलंत. आणि तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाची जागा बदललीत. अशा प्रकारचा संघ निवडणाऱ्यांचा सत्कारच केला पाहिजे," अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक याने टीका केली.
"पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणि निवडसमितीने खेळाडूंची पुन्हा एकदा चाचणी घ्यायला हवी. कोणत्या खेळाडूची किती उपयुक्तता आहे याची कल्पना त्यांना यायला हवी. पाकिस्तानची दाणादाण उडाल्याची ही पहिलीच वेळ नाही. मी केवळ द्विपक्षीय क्रिकेट मालिकांबद्दल बोलत नाही, मी आशिया कप, वर्ल्डकप, टी२० विश्वचषक अशा ICC स्पर्धांबाबत बोलतोय. आपण न्यूझीलंडशी फारच वाईट पद्धतीने हरलो. त्यानंतर आपल्या संघात कुठलीही सुधारणा दिसली नाही. भारतानेही आपल्याला सहज हरवलं," याकडेही त्याने लक्ष वेधलं.