Join us

Bangladesh Vs New Zealand : मागील १० वर्षांत जे भारत, पाकिस्तानला जमलं नाही ते बांगलादेशनं करुन दाखवलं, न्यूझीलंडला त्यांच्याच घरी लोळवलं

Bangladesh Vs New Zealand : बांगलादेशनं जुनी मालिका खंडित करत रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 14:06 IST

Open in App

न्यूझीलंडच्या (New Zealand) भूमीवर कसोटी सामना जिंकणे ही कोणत्याही परदेशी संघासाठी मोठी गोष्ट असते. गेल्या १० वर्षांत भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांसारख्या आशियाई संघांनी (Asian Cricket Teams) येथे एकही कसोटी जिंकली नाही, परंतु बांगलादेशने ही मालिका खंडित केली आहे. बांगलादेशने (Bangladesh) बे ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत यजमानांचा आठ गडी राखून पराभव करून ही १० वर्षे जुनी मालिका खंडित केली. गेल्या १० वर्षांत न्यूझीलंडमध्ये केवळ दोनच कसोटी संघ विजयाची नोंद करू शकले आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त, गेल्या १० वर्षांत इतर कोणत्याही संघाला न्यूझीलंडला हरवता आलेले नाही.गेल्या १० वर्षात न्यूझीलंडने घरच्या मैदानावर एकूण ४० कसोटी सामने खेळले आहेत आणि या कालावधीत केवळ पाच वेळा पराभव पत्करावा लागला आहे. न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून दोनदा पराभव झाला आहे, तर बांगलादेशने एकदा ही कामगिरी केली आहे. इंग्लंडने गेल्या १० वर्षांत न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत, परंतु त्यापैकी एकही कसोटी सामना त्यांना जिंकता आलेला नाही.

तर श्रीलंकेने गेल्या १० वर्षांत न्यूझीलंडच्या भूमीवर सहा वेळा कसोटी सामने खेळले आहेत, परंतु श्रीलंकेचाही संघ एकही सामना जिंकू शकला नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी गेल्या १० वर्षांत न्यूझीलंडमध्ये प्रत्येकी चार कसोटी सामने खेळले आहेत, परंतु हे दोन्ही संघ विजयापासून दूर राहिले.

भारताचा एक सामना अनिर्णितभारताने एक कसोटी अनिर्णित राखली, तर पाकिस्तानने चारही सामने गमावले. इंग्लंडबद्दल सांगायचे झाले तर त्याची कामगिरी या आशियाई संघांपेक्षा सरस होती. इंग्लंडने गेल्या १० वर्षांत न्यूझीलंडमध्ये सात कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन गमावले आहेत, तर उर्वरित पाच सामने अनिर्णित राहिले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे असे संघ आहेत ज्यांनी गेल्या १० वर्षांत न्यूझीलंडच्या भूमीवर एकही कसोटी सामना गमावलेली नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ या ठिकाणी दोन कसोटी खेळला आणि त्यांनी दोन्ही सामन्यात विजय मिळवला. तर दक्षिण आफ्रिकेने एकूण सहा कसोटी सामन्यातील दोन जिंकले आणि चार सामने अनिर्णित राहिले.

टॅग्स :बांगलादेशन्यूझीलंडपाकिस्तानभारत
Open in App