अयाझ मेमनडाव्या हाताचा अंगठा दुखावल्यानंतर किमान तीन आठवडे शिखर धवन क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ॠषभ पंतला राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. धवनची दुखापत पूर्ण बरी होण्याबाबत नक्की किती वेळ लागेल, याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, धवनला दुखापतीतून सावरण्यास दोन आठवडे किंवा त्याहूनही अधिक वेळ लागेल. शिवाय अशा दुखापतीतून लवकरात लवकर ठीक होणे हे त्या व्यक्तीवरही अवलंबून असते. त्यामुळेच सध्या प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही,’ अशी माहिती भारतीय संघातील एका सदस्याने दिली आहे. भारतीय संघाला आता धवनच्या अनुपस्थितीमध्ये काही सामने खेळावे लागतील हे नक्की. त्याचवेळी दुसरीकडे आॅस्टेÑलियालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत असून त्यांनी दुखापतग्रस्त मार्कस स्टोइनिसच्या जागी मिशेल मार्शला संघात बोलाविले आहे.कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्याची क्षमता राखून असल्याने पंतला संघात बोलाविण्यात आलेले नाही. पण तोही धवनप्रमाणेच डावखुरा फलंदाज आहे. संघात उजवा-डावखुरा फलंदाजांच्या समावेशाने प्रतिस्पर्धी गोलंदाजीची लय काही प्रमाणात बिघडवता येते. पण तरी विजय मिळविण्यासाठी हा ठोस पर्याय नसेल. जेव्हा भारताने १९८३ साली ऐतिहासिक विश्वचषक जिंकला होता, तेव्हा संघात केवळ वेगवान गोलंदाज सुनील वॉल्सन हाच डावखुरा फलंदाज होता; आणि त्याला स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता सलामीला लोकेश राहुल खेळणार हे जवळपास निश्चित असताना चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, हाच प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. संघ निवडीच्या वेळी मुख्य निवडकर्ते एम.एस.के. प्रसाद यांनी विजय शंकर याला ‘थ्रीडी क्रिकेटर’ अशी उपमा देताना चौथ्या स्थानासाठी उपयुक्त खेळाडू ठरविले होते.( लेखक लोकमत वृत्तसमुहात सल्लागार संपादक आहेत )