अयाज मेमनकन्सल्टिंग एडिटर
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय न्यूझीलंडने घेतला पण त्यांना आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आले. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी ५७ धावांची सलामी देत न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे न्यूझीलंडचे ३०० च्या पुढील धावांचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट झाले, पण त्यानंतर नियमित अंतराने गडी बाद झाले. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी न्यूझीलंडला रोखले.
एकवेळ न्यूझीलंड संघाला २०० धावाही पार करता येणार नाहीत, असे वाटत होते. मात्र, मायकेल ब्रेसवेलने नाबाद शतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
७ वे आयसीसी जेतेपद १९८३: वनडे विश्वचषक, २००२: चॅम्पियन्स ट्रॉफी, २००७ : टी-२० विश्वचषक, २०११: वनडे विश्वचषक, २०१३ : चॅम्पियन्स ट्रॉफी, २०२४: टी-२० विश्वचषक, २०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफी
खेळपट्टीकडून फिरकीला मदत खेळपट्टीने फिरकीला मदत केल्याचे पाहायला मिळाले. वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे शमी आणि हार्दिक पांड्या यांच्या गोलंदाजीवर धावा निघाल्या. शंभर धावा वेगवान गोलंदाजांकडून मिळाल्या. फिरकीपटूंनी अतिशय प्रभावी मारा करताना मोजक्याच धावा दिल्या आणि बळीही घेतले. त्यामुळे न्यूझीलंडचे फलंदाज मुक्तपणे खेळू शकले नाहीत.
न्यूझीलंडकडून भारतीय फलंदाजांची कोंडी
पहिल्या डावानंतर सामना एवढा रोमांचक होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. भारत सहजपणे हा सामना जिंकेल असे वाटत होते. पण न्यूझीलंडने पूर्ण ताकद पणाला लावत अतिशय कौशल्याने भारतीय फलंदाजांसमोर आव्हान उभे केले.
फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना जखडून टाकले होते. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चेंडू टाकताना अचूकता कायम राखली तसेच, क्षेत्ररक्षकांकडून त्यांना पूर्णपणे मदत मिळाली. प्रत्येक संधीचा त्यांनी लाभ घेतला.
सामना ४० षटकांत संपेल असे वाटत असताना रोहितने शानदार फलंदाजी केली पण पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, आणि हार्दिक पांड्या हे आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ भारतावर दडपण आणण्यात यशस्वी ठरला.
राहुलने भारताला नेले विजयाकडे
विराट कोहली संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज आहे असे वाटत होते पण तो। न्यूझीलंडविरुद्ध अपयशी ठरला. केएल राहुलने अतिशय जबाबदारीने खेळत भारताला विजयाकडे नेले. शांत डोक्याने खखेळत राहुलने आपली कामगिरी केली. ऋषभ पंतच्या जागी त्याला संधी दिल्याने खूप टीका झाली होती पण त्याने हा निर्णय योग्य ठरविला.