Prithvi Shaw Flop Show In T20 Mumbai League : कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून दाबात एन्ट्री मारणारा पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. आधी टीम इंडियातून आउट झाल्यावर देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. परिणामी आयपीएलच्या मेगा लिलावत त्याच्यावर अनसोल्ड राहण्याची वेळ आली. त्यात आता लोकल टी-२० लीगमध्ये मिळालेल्या संधीच सोनं करण्यातही तो कमी पडताना दिसतोय. टी २० मुंबई लीग २०२५ च्या स्पर्धेतही तो फ्लॉप ठरलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संधीचं नाही तर लोकल लीगमध्ये कॅप्टन्सीही मिळालीये, पण..
टी २० मुंबई लीगच्या तिसऱ्या हंगामात पृथ्वी शॉ हा नॉर्थ मुंबई पँथर्स संघाचा आयकॉन प्लेयर आणि कर्णधार आहे. बुधवारी नमो बांद्रा ब्लास्टर्स विरुद्ध नॉर्थ मुंबई पँथर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना नमो बांद्रा संघाने १७१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पृथ्वीचा संघ १३१ धावांत आटोपला. या साम्यात ना पृथ्वीला कॅप्टन्सीची छाप सोडता आली ना त्याने बॅटिंगमध्ये धमक दाखवली.
IPL मध्ये केली बक्कळ कमाई; 'नॅशनल ड्युटी' बजावण्याची वेळ आल्यावर म्हणाला, मला विश्रांती हवी!
४ चेंडूत ५ धावांत तंबूत परतला पृथ्वी
बांद्रा ब्लास्टर्स विरुद्धच्या सामन्यात डावाची सुरुवात करताना पृथ्वी शॉ ४ चेंडूत ५ धावा करून तंबूत परतला. या खेळीत त्यानं फक्त एक चौकार मारला. कर्णधारानं तलवार म्यान केल्यावर संघही गडबडला. पृथ्वी शॉ हा गेल्या दोन-तीन वर्षांपासून फिल्डवरील कामगिरीशिवाय फिल्डबाहेरील गोष्टींमुळेच चर्चेत आहे. टीम इंडिया तर दूरच पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडूनही तो सातत्याने अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. आता लोकल लीगमध्येही त्याची डाळ शिजणं अवघड झाल्याचे दिसते.
पदार्पणातील कसोटी सामन्यात शतक, पण...
पृथ्वी शॉनं २०१८ मध्ये भारतीय कसोटी संघात एकदम धमाक्यात पदार्पण केले होते. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या सौरव गांगुली आणि विनोद कांबळी यांच्या खास पक्ंतीत त्याचे नाव आहे. पण कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे त्याला टीम इंडियातील आपले स्थान टिकवण्यात अपयश आले. २०२० मध्ये तो टीम इंडियाकडून अखेरचा कसोटी सामना खेळला असून २०२१ मध्ये त्याने टीम इंडियाकडून शेवटचा टी-२० सामना खेळला होता.