Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. मात्र मैदानाबाहेर तो खूप शांत आणि दिलखुलास शैलीसाठी ओळखला जातो. म्हणूनच आयपीएलमध्ये गेली अनेक वर्षे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद संभाळणाऱ्या रोहित शर्माला मुंबईकर क्रिकेटप्रेमी 'मुंबईचा राजा' म्हणूनही ओळखतात. याच हिटमॅनने आठ वर्षांपूर्वी एका तरुणाची नोकरी वाचवली होती. आता तोच तरुण एक यशस्वी क्रिकेट कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत आहे.
क्रिकेट कंटेंट क्रिएटर आणि प्रेझेंटर तनय तिवारीने त्याच्यासोबत एक जुना किस्सा शेअर केल्यानंतर रोहित शर्माचा दिलखुलास स्वभाव समोर आला आहे. तनय तिवारी एकेकाळी मुंबई इंडियन्ससाठी काम केले होते. आता एका मुलाखतीमध्ये तनयने रोहित शर्माने कशाप्रकारे त्याची नोकरी वाचवली याचा किस्सा सांगितला आहे.
आयपीएल आणि भारतीय संघाच्या कव्हरेजचा भाग असणाऱ्या प्रेझेंटर तनय तिवारीने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर २०१७ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये इंटर्न असतानाचा एक प्रसंग सांगितला."मी रोहित शर्माची मुलाखत घेत होतो आणि टेबल खूपच लहान होते. कॅमेरा देखील सेट करायचा होता आणि सर्व काही घाईघाईत घडत होते. दरम्यान, माझ्याकडून चुकून रोहित शर्मावर गरम कॉफी सांडली. त्यावेळी त्यांच्या टीममधील एका महिला सदस्याकडून मला खूप ओरडा बसला. त्यावेळी मी फक्त २१ वर्षांची होतो आणि मला वाटले की आता माझे करिअर संपले आहे. मी तिथेच रडायला सुरुवात करणार होतो," असं तनय तिवारीने सांगितले.
"पण, त्यावेळी फटकारण्याऐवजी रोहित शर्माने मला प्रोत्साहन दिले. रोहित म्हणाला, "जाऊ दे मित्रा, तो लहान आहे. तू प्रश्न विचार, त्याने फक्त कॉफीच सांडली आहे. काळजी करू नको," असंही तनयने सांगितले. त्या क्षणी रोहितने केवळ चूक दुर्लक्षित केली नाही तर तनयचा आत्मविश्वासही वाचवला. आज, तनय तिवारीचे इंस्टाग्रामवर सुमारे ५ लाख फॉलोअर्स आहेत आणि त्याने जिओ-हॉटस्टार सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम केले आहे. जर रोहित शर्माने मला त्या दिवशी साथ दिली नसती तर माझा प्रवास तिथेच संपला असता असे तनयचे मत आहे.
तनयने सांगितले, "मी रोहित दादाला अनेक वेळा सांगितले की तू त्या दिवशी जे केलेस ते माझ्यासाठी खूप मोठे होते. तुला माहित नाही की तू किती लोकांना खूश केले आहेस." यावर रोहित फक्त हसला आणि म्हणाला की अरे मित्रा, ये आणि त्यानंतर त्याने मला मिठी मारली."
दरम्यान, रविवारी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्जने अंतिम फेरीत धडक मारली. या पराभवासोबत मुंबई इंडियन्सचा या आयपीएलमधील प्रवास संपला. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अंतिम सामना होणार आहे. क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्सने पराभव केला आणि त्यांचे फायनल खेळण्याचे स्वप्न संपुष्टात आणले.
Web Title: My Career was saved because of Rohit Sharma sports presenter tells the unheard story of Hitman
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.