नवी दिल्ली: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 300 विकेट घेणारा ऑफस्पिनर आर अश्विनचं अभिनंदन करताना श्रीलंकेचा माजी महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. अश्विन सध्याच्या काळातील जगातला सर्वश्रेष्ठ स्पिनर आहे अशा शब्दांमध्ये मुरलीधरनने अश्विनवर कौतुकाची थाप दिली.
कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट घेणं म्हणजे मोठं यश आहे, अश्विन भारताच्या वन-डे संघात नाही, पण भारतासाठी वन-डे क्रिकेटमध्येही सातत्याने खेळून दमदार प्रदर्शन करेल अशी अपेक्षा मुरलीधरनने व्यक्त केली. अश्विन तुझा विक्रम मोडेल असं वाटतं का, या प्रश्नावर उत्तर देताना मुरली म्हणाला, अश्विन आता 31-32 वर्षांचा आहे. त्याच्यासमोर मोठं करिअर आहे, तो बरेच रेकॉर्ड बनवेल. अजून किमान चार ते पाच वर्षे तो खेळेल. तो कसं प्रदर्शन करतो आणि फिटनेस कशी राखतो यावर सर्वकाही अवलंबून असेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर वेळच देईल कारण 35 वर्षानंतर खेळणं सोपं नसतं असं मुरलीधरन म्हणाला.
अश्विनने मोडला लिलीचा विक्रम-
- भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने सोमवारी श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयात सर्वांत वेगवान ३०० बळी घेण्याचा डेनिस लिलीचा विक्रम मोडला.
- ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज लिलीने १९८१ मध्ये ५६ कसोटी सामन्यांत हा विक्रम नोंदवला होता. ३६ वर्षांनंतर आश्विनने या विक्रमाला गवसणी घातली. आश्विनने विक्रमी कामगिरी करताना अनेक दिग्गजांना पिछाडीवर सोडले. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (५८ कसोटी), रिचर्ड हॅडली, माल्कम मार्शल व डेल स्टेन (६१ कसोटी) यांचा यात समावेश आहे.
- कसोटी क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा अश्विन भारताचा पाचवा गोलंदाज आहे. त्याच्यापेक्षा अधिक बळी घेणा-या गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे (६१९), कपिलदेव (४३४), हरभजन सिंग (४१७) आणि झहीर खान (३११) यांचा समावेश आहे. बिशनसिंग बेदी (२६६), भागवत चंद्रशेखर (२४२) आणि इरापल्ली प्रसन्ना (१८९) हे जगप्रसिद्ध त्रिकूट आश्विनच्या तुलनेत पिछाडीवर आहे.
- अश्विन म्हणाला, ‘६०० बळी घेण्यात यश येईल, अशी आशा आहे. आता मी केवळ ५४ कसोटी सामनेच खेळलेले आहेत. फिरकी गोलंदाजी सोपी नाही. आम्ही बरीच षटके टाकली आणि विश्रांतीचाही मला लाभ झाला. आता मला फ्रेश वाटते.’
अश्विन पुढे म्हणाला, ‘कॅरम बॉल चांगला चेंडू असून गेल्या दोन वर्षांत मी याचा अधिक वापर केला नाही. मी त्यावर बरीच मेहनत घेतली आहे. मी प्रदीर्घ ब्रेक घेतला; पण वोर्सेस्टरमध्ये माझी कामगिरी चांगली झाली. मला अनेक नव्या बाबी शिकता आल्या.’
अश्विनचा ३०० वा बळी लाहिरू गमागे ठरला. त्याला त्याने ‘दुसरा’ चेंडूवर बाद केले. अश्विनने २५.१५ च्या सरासरीने बळी घेतले आहेत.